महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त प्रबोधन पर्वासंदर्भात बैठक घ्यावी

पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिका क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे आणि कार्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी दरवर्षी जयंती प्रबोधन पर्व घेत असते. त्याचे नियोजन करण्यासाठी प्रशासकीय स्तरावर अद्याप बैठक घेण्यात आलेली नाही. तरी, बैठक घेऊन प्रबोधन पर्वाचे योग्य नियोजन करण्यास राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील तज्ञांची मते जाणून घ्यावीत, अशी मागणी एमआयएमचे शहराध्यक्ष धम्मराज साळवे यांनी केली आहे.

यासंदर्भात आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यात साळवे यांनी म्हटले आहे की, 11 एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले व 14 एप्रिल भारतरत्न डॉ.  बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. या दोन्ही जयंत्या शहरातील तमाम नागरिकांसाठी विचारांची पर्वणी असते. त्यासाठी प्रबोधन पर्वामध्ये शहरातील सर्व विभागातून नागरिक  महापुरुषांचे विचार प्रबोधनपर कार्यक्रमासाठी नागरिक येत असतात.

हे प्रबोधन पर्व संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. दरवर्षी, या संदर्भामध्ये शहरातील राजकीय पक्ष संघटनांचे पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी व आपल्या उपस्थितीमध्ये महापालिकेमध्ये बैठक होते असते. परंतु, यावर्षी अध्यापपर्यंत बैठक झालेली नाही.  आयुक्तसाहेब आपण शहराचे प्रशासक आहात. आपण तात्काळ याची दखल घेऊन प्रशासनाच्या माध्यमातून व पक्ष, संघटना सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये जयंती प्रबोधन पर्वाची बैठक घ्यावी. प्रबोधन पर्वाचे  योग्य नियोजन कसे होईल याच्यावर संवाद घडवून निर्णय घ्यावा, अशी मागणी साळवे यांनी केली आहे.

Share to