लायन्स क्लबने दिलेल्या पुस्तकांमुळे पिंपळे सौदागरवासियांच्या ज्ञानात पडणार भर – कुंदा भिसे
- विठाई वाचनालयाला लायन्स क्लबतर्फे 100 पुस्तकांचा संच भेट
- क्लबच्या अध्यक्षा अंजुम सय्यद यांनी केले कुंदाताईंच्या कार्याचे कौतुक
पिंपरी (प्रतिनिधी) – पुस्तके ही आपली सर्वात चांगले मित्र असतात. साहित्याचे अनेक प्रकार आहेत. विविध नामवंत लेखकांनी आपली लेखणी पनाला लावून वाचकप्रेमींची वाचनाची भूक भागवण्यासाठी पुस्तके लिहीली आहेत. पुस्तकांचे भांडार आयुष्याला कलाटणी देणारे ठरते. त्यामुळे लायन्स क्लबने पुस्तकांचे भांडार उपलब्ध करून दिल्याने पिंपळे सौदागरमधील वाचकांच्या ज्ञानात आणखीन भर पडली आहे, असे प्रतिपादन उन्नति सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा कुंदाताई भिसे यांनी केले.
उन्नति सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा कुंदाताई भिसे यांनी पिंपळे सौदागरमधील वाचक प्रेमींची वाचनाची आवड जपण्यासाठी सुरू केलेल्या विठाई वाचनालयाची दखल विविध क्षेत्रात सामाजिक काम करणा-या संघटना देखील घेऊ लागल्या आहेत. वाचकांच्या वाचनामध्ये अणखीन भर पडावी, यासाठी लायन्स क्लब ऑफ पिंपळे सौदागर तर्फे विविध प्रकारच्या मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील 100 पुस्तकांचा संच विठाई वाचनालयास भेट देण्यात आला आहे. विठाई वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. सुभाषचंद्र पवार, उपाध्यक्ष रमेश वाणी, फाउंडेशनचे संस्थापक संजय भिसे, अध्यक्षा कुंदाताई संजय भिसे, सामाजिक कार्यकर्ते समीर काटे, अंजुम सय्यद, गुलशन नाईकवडे, शोभा देवरे व इतर वाचनालयाचे सभासद उपस्थित होते.
कुंदाताई भिसे म्हणाल्या, वेगवेगळ्या महापुरूषांची आत्मचरित्रे, त्यांचा त्या-त्या क्षेत्रातील प्रवास, त्यांनी केलेले कर्य यावर अधारित पुस्तके नवीन पिढीला यशाचा मार्ग दाखविणारी ठरतात. अधुनिक काळातील धावत्या जीवनशैलीमुळे आपल्या समोर असंख्य समस्या निर्माण होत आहेत. त्यातून मार्ग काढण्याचा मूलमंत्र पुस्तकातूनच सापडतो. त्यामुळे लेखन साहित्य हे आयुष्याला दिशा देणारे ठरते. लायन्स क्लबने पुढाकार घेऊन वाचकप्रेमींना हे साहित्य उपलब्ध करून दिले. त्याचा पिंपळे सौदागरमधील वाचकांना नक्कीच फायदा होईल, त्यामुळे लायन्स क्लबचे आभार.
लायन्स क्लबच्या अध्यक्षा अंजुम सय्यद म्हणाल्या, उन्नति सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून अध्यक्षा कुंदाताई संजय भिसे या गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक उपक्रम राबवित आहेत. काळाच्या ओघामध्ये निर्माण झालेल्या आपात्कालीन परिस्थितीत देखील कुंदाताईंनी जीवाची पर्वा न करता नागरिकांची सेवा केली. विशेष म्हणजे पिंपळे सौदागर भागातील नागरिकांची वाचनाची आवड जपण्यासाठी त्यांनी विठाई वाचनालय सुरू करून खूप मोठे कार्य केले. आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर वाचन महत्वाचे आहे. त्यासाठी हे वाचनालय नवीन तसेच जुन्या पीढीला मार्गदर्शक ठरत आहे. त्यामुळे कुंदाताईंचे धन्यवाद.