शिवसेनेतील बंडखोरांचा राजकीय संन्यास सुरु, संपर्क प्रमुख आमदार सचिन अहिर यांची टिका
पिंपरी – शिवसेनेचे बंडखोर मंत्री, आमदारांचे बोलविते धनी हळूहळू जनतेच्या नजरेसमोर येत आहेत. विधानसभेतील फ्लोअर टेस्टच्या अगोदर बंडखोरांना रोड टेस्टला सामोरे जावे लागणार आहे. पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठित खंजीर का उपसला याचा जाब मतदार, शिवसैनिक विचारणार आहेत. उद्धवसाहेबांना धोका दिल्याने बंडखोरांबाबत शिवसैनिकांसह ज्यांचा शिवसेनेशी काहीही संबंध नाही, अशा सर्वसामान्य लोकांमध्ये संताप, चीड निर्माण झाली आहे. बंडखोरांनी शिवसेनेच्या आमदारकीचे राजीनामे देऊन निवडणुकीला सामोरे जावे. त्यांचे डिपॉझीट जप्त केल्याशिवाय राहणार नाही अशी लोकांची प्रतिक्रिया आहे. बंडखोरांचा राजकीय जीवनातील संन्यास सुरु झाला असल्याचे वक्तव्य शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सचिन अहिर यांनी केले.
पिंपरी-चिंचवड शहर युवा शिवसेनेच्या पुढाकाराने आयोजित शहरातील पदाधिका-यांची बैठक आज (सोमवारी) आकुर्डी येथे पार पडली. अहिर यांची विधानपरिषदेवर निवड झाल्यानिमित्त युवा अधिकारी विश्वजीत बारणे यांच्या वतीने सत्कार केला. युवा सेनेचे पुणे जिल्हा समन्वयक राजेश पळसकर, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, महिला संघटिका उर्मिला काळभोर, युवा सेना अधिकारी विश्वजीत बारणे, उपजिल्हाप्रमुख निलेश मुटके, कामगार नेते इरफान सय्यद, महापालिकेतील माजी गटनेते राहुल कलाटे, माजी नगरसेवक अमित गावडे, प्रमोद कुटे, माजी नगरसेविका रेखा दर्शिले, मावळ तालुकाप्रमुख राजेश खांडभोर, शादान चौधरी, पिंपरी विधानसभा प्रमुख राजेश वाबळे, चिंचवडचे अनंत को-हाळे, भोसरीचे धनंजय आल्हाट आदी उपस्थित होते.
सचिन अहिर म्हणाले, ”शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्तेच आषाढीवारीची विठ्ठलाची पुजा व्हावी अशी वारक-यांची भावना आहे. कोरोना महामारीच्या दोन वर्षाच्या काळात कुटुंबप्रमुख या नात्याने उद्धव ठाकरे यांनी काम केले. महाराष्ट्राला संकटातून बाहेर काढले. त्यांच्या मागे आमचे लाख-लाख आर्शिवाद आहेत. संकटे येतील, जातील पण उद्धवसाहेबांचे कार्य हृदयात आहे. ते कोणी काढून नेवू शकत नाही, ही वारक-यांची भूमिका आहे. उद्धवसाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसण्याची गरज नव्हती, अशी सर्वसामान्यांमध्ये चर्चा आहे. बंडखोरांचे डिपॉझीट जप्त केल्याशिवाय राहणार नाही अशी लोकांची प्रतिक्रिया आहे”.