Special Report : आता शिवसेना ‘ना घर की ना घाट की’ ?, उध्दव ठाकरे पक्षाला कसे ‘सावरणार’
मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. शिवसेनेचे 40 आमदार शिंदे यांच्यासोबत गेल्यानंतर ठाकरे यांच्याकडे आता केवळ 16 आमदार राहिले आहे. त्यामुळे शिवसेनेला आता विरोधी पक्षात बसण्याचे देखील स्थान नाही. नेहमीच सत्तेच्या केंद्रस्थानी राहिलेल्या शिवसेनेची आगामी वाटचाल बिकट बनली आहे. छगन भुजबळ असतील नारायण राणे असतील किंवा राज ठाकरे यांच्या बंडानंतर देखील शिवसेनेवर एवढी वाईट वेळ आली नव्हती. अतिशय वाईट पध्दतीने शिवसेनेला पायउतार व्हावे लागले आहे. उध्दव ठाकरे यांच्या दुर्लक्षपणामुळे शिवसेनेच्या वाटचालीत हा सर्वात मोठा ‘बॅडपॅच’ मानला जात आहे. आता विधानसभेतील त्यांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी 51 आमदारांना फोडले. त्यात शिवसेनेचे 40 आमदार आहेत. आता शिवसेनेकडे केवळ 16 आमदार उरले आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या विधीमंडळातील संख्याबळाला मोठा धक्का पोहोचला आहे. महाविकास आघाडीत शिवसेनेकडे 56, राष्ट्रवादीकडे 53 आणि काँग्रेसकडे 44 आमदार आहेत. शिवसेनेकडे केवळ तीन आमदार अधिक असतानाही काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सर्वात मोठा पक्ष म्हणून शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपद दिलं. शिवाय शिवसेनेला महत्त्वाची खातीही दिली. आता शिंदे याच्या बंडामुळे शिवसेनेकडे अवघे 16 आमदार उरले. तर राष्ट्रवादी हा आघाडीतील सर्वात मोठा पक्ष ठरत आहे. त्यामुळे विधानसभा आणि विधान परिषदेतील नेतृत्व आपोआपच राष्ट्रवादीकडे जाणार आहे. तर, शिवसेनेला विधानसभेत तिस-या स्थानावर समाधान मानावे लागणार आहे.
एकनाथ शिंदेंचा गट विधानसभेत शिवसेनेचा गट म्हणूनच नोंदणीकृत राहणार आहे. हा गट सत्तेत बसला तरी मूळ शिवसेना ही विरोधात असणार आहे. शिंदे गटाच्या दाव्यानुसार, त्यांच्याकडे संख्याबळ अधिक आहे. त्यामुळे आमचीच शिवसेना खरी आहे. ठाकरे यांच्याकडील आमदारांना आमचा व्हीप लागू होईल. त्यांना आमचं म्हणणं ऐकावं लागेल, असं शिंदे गटाचं म्हणणं आहे. शिंदे गटाच्या या भूमिकेमुळे कायदेशीर पेच निर्माण होणार आहे. असे असले तरी शिवसेनेने त्यांच्या वाटचालीत अनेक चढउतार पाहिले आहेत. शिवसेनेत अनेकदा बंड झालं. पहिलं बंड शिवसेनेचे पहिले महापौर हेमचंद्र गुप्ते यांनी केलं. त्यानंतर बंडू शिंगरे यांनी केलं. शिंगरे यांनी तर शिवसेना प्रमुखांच्या हयातीत शिवसेना स्थापन केली होती. त्यानंतर छनग भुजबळ, नारायण राणे, गणेश नाईक आणि राज ठाकरे यांनीही बंड केलं. पण, या बंडाचा कोणताच परिणाम शिवसेनेवर झाला नाही.
शिवसेना पुन्हा एकदा नव्या जोमाने उभी राहिली. या 56 वर्षाच्या काळात शिवसेनेने राज्याला मनोहर जोशी, नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्या रुपाने तीन मुख्यमंत्री दिले. शिवसेनेने विधानसभा आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदही लिलया सांभाळलं. शिवसेना नेहमीच राज्यातील राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिली आहे. शिंदे यांचं बंड हे शिवसेनेसाठी मोठा बॅडपॅच आहे. त्यातून उद्धव ठाकरे या धक्क्यातून स्वतःला सावरत पुन्हा शिवसेना कशी बळकट करणार हे पहावे लागणार आहे.