पवना धरणात 42 टक्के पाणीसाठा, पावसाचा जोर कायम
पिंपरी :- मावळ तालुका परिसरात गेल्या अकरा दिवसांपासून संततधार पाऊस कायम आहे. त्यामुळे पवन धरणात अल्प कालावधीत तब्बल २७ टके साठा वाढला आहे. धरणात बुधवारी (दि. १३) सकाळी साडेआठ वाजेपर्यंत ४२.१८ टक्के पाणीसाठा तयार झाला आहे. गेल्या वर्षी याच दिवशी ३३.६० टक्के इतका पाणीसाठा होता.
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा धरण परिसरात जोरात पाऊस असल्याने पिंपरी चिंचवड शहरवांसीयांसह मावळसाठी दिलासादायक स्थिती निर्माण झाली आहे. पाऊसाने संपूर्ण जून महिना दडी मारली. पाऊस लांबल्याने चिंता वाढली होती. जुलैच्या ४ तारखेला पवना धरणातील पाणीसाठा १६.२६ टके खाली पोहचला होता. त्यानंतर पावसाने दमदार हजेरी लावली आहे. संततधार कायम आहे. धरण क्षेत्रात आतापर्यंत १०५२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
पुरेसा पाणीसाठा होऊ लागल्याने पाणीटंचाईचे संकटही टळले आहे. ही बाब पिंपरी – चिंचवड शहरांतील नागरिक तसेच, मावळ परिसरातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बाब आहे. पावसाची संततधार कायम राहिल्यास जुलै महिना अखेरपर्यंत पवना धरण १०० टक्के भरेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.