पावसाळ्यामध्ये जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव, नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पिंपरी – “पावसाळ्यामध्ये जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी नागरिकांनी घ्यावयाची काळजी, असे आवाहन महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने केले आहे.

“पिंपरी चिंचवड शहरात मागील काही दिवसापासून अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव होऊन साथ पसरु नये, यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी, असे महानगरपालिकेच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.

नागरिकांनी महानगरपालिकेच्या नळावाटे होणाऱ्या पाण्याचा वापर पिण्यासाठी करावा. बोअरवेल, शुद्धीकरण न केलेल्या विहिरीच्या पाण्याचा वापर पिण्यासाठी करू नये. शिळे किंवा उघड्यावरचे माश्या बसलेले अन्न पदार्थ खाऊ नयेत, तसेच अन्न पदार्थ व्यवस्थित झाकून ठेवावेत. प्रत्येक नागरिकाने वैयक्तिक स्वच्छतेचे पालन करावे. नागरिकांनी घराभोवतीचा परिसर स्वच्छ ठेवावा.

जुलाब, ताप वगैरे आजार झाल्यास वेळीच मनपाच्या नजिकच्या दवाखाना रुग्णालयात उपचार करून घ्यावेत. सर्व महानगरपालिकेच्या दवाखान्यात आणि रुग्णालयात उपचाराची सोय उपलब्ध आहे. पिण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी उकळून घेऊन पिण्यासाठी वापरण्यात यावे. सर्व खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी त्याचेकडे उपचारास आलेल्या कॉलरा, टायफॉईड, गॅस्ट्रो, डिसेंट्री, कावीळ रुग्णांची माहिती मनपाच्या नजिकच्या दवाखाना रुग्णालयास त्वरित कळवावी.

जेथे लेबर कॅम्प आहे, त्या ठिकाणच्या सर्व बांधकाम व्यावसायिकांनी महानगरपालिकेच्या नळावाटे पुरविलेले पाणी पिण्यासाठी वापरावे. जलजन्य आजार होऊ नयेत, याबाबत सर्व कामगारांना सूचना देऊन दक्षता घ्यावी, असे आवाहन पालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून करण्यात आले आहे.

Share to