खोट्या घोषणांद्वारे ठाकरे सरकारकडून अनुसूचित जातीची फसवणूक

  • भाजपा प्रदेश मंत्री अमित गोरखे यांनी केला तिव्र शब्दांत निषेध
  • ‘बार्टी’ला निधी कमी पडू न देण्याची वल्गना विरली हवेत

पिंपरी / महाईन्यूज

राज्यभरात रोष निर्माण झाल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी)ला आज अर्थसंकल्पात तरतूद केलेल्या ३०० कोटी पैकी केवळ ९१.५० कोटी रुपये निधी वितरित करण्यात आला. बार्टीमार्फत राबविण्यात येणाऱ्या कोणत्याही योजनेला निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी खोटी घोषणा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी केली असली तरी सहा महिन्यानंतर दिलेली अल्प तरतूद ही आघाडी सरकारची अनास्था स्पष्ट करणारी आहे. अत्यल्प निधी मंजूर करणारा अर्थ विभाग व सामाजिक न्याय मंत्र्यांची भूमिका अनुसूचिती जाती विरोधी असल्याचा आरोप करत भाजपाचे प्रदेश मंत्री अमित गोरखे यांनी याचा तिव्र शब्दांत निषेध केला आहे.

बार्टीमार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रम व कार्यशाळा आदींसाठी ९० कोटी रुपये तसेच महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक देखभाल समितीसाठी दीड कोटी असे एकूण ९१.५० कोटी रुपये आज स्वतंत्र शासन निर्णयाद्वारे वितरित करण्यात आले आहेत. गेली सहा महिने बार्टीच्या योजनांची केली जाणारी दुरवस्था पाहता अनुसूचित जातीमध्ये तसेच समाजमाध्यमांमध्ये बार्टीच्या योजना बंद पडणार अशा आशयाच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. बार्टीची प्रत्येक योजना तळागाळातील अनुसूचित जाती घटकांतील विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी आहे. यांपैकी कोणतीही योजना बंद पडणार नाही, यांची काळजी ठाकरे सरकारने घेणे गरजेचे आहे.

सरकारने केलेली अल्प तरतूद अनुसूचित जातीच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे. सरकारने जाणिवपूर्वक गेली सहा महिने निधी मंजूर करण्यात चालढकल केली. सामाजिक न्यायमंत्री त्यांच्याच “घरातील” मालिकेत अडकुन पडल्याने त्यांची धडपड स्वतःचे मंत्रिपद वाचविण्यासाठी सुरू आहे. आघाडी सरकारने आरक्षित वर्गाच्या पदोन्नतीमध्ये आरक्षण नाकारले. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सा. अण्णाभाऊ साठे महामंडळाला १०० कोटीची घोषणा विधिमंडळात केली. परंतु, ती अजूनही कागदावरच आहे, ह्या ठाकरे सरकारने अनुसूचित जातीच्या योजना बंद करून त्याचा निधी इतरत्र वळविण्याचा डाव आखला आहे, असाही आरोप गोरखे यांनी केला आहे.

अनुसूचीत जातीसाठीचा सर्व निधी, सर्व महामंडळांचा निधी या सरकारने ताबडतोब द्यावा. अन्यथा याचे पडसाद राज्यभर उमटतील, असा इशारा भाजपा प्रदेश मंत्री व सा. अण्णाभाऊ साठे महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिला आहे.

Share to