भ्रष्टाचारावरुन ‘आब्रुचे खोबरे’ झालेल्या भाजप पदाधिका-यांचे आयुक्तांवर आरोप म्हणजे ‘उलटा चोर कोतवाल को डांटे’
- काँग्रेस शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांचा सत्ताधा-यांवर हल्लाबोल
- महापौर, दोन आमदार, स्थायीच्या सभापतींना दिले खुले आव्हान
पिंपरी | महाईन्यूज
भाजपच्याच काही नगरसेवकांनी आपल्याच नेत्यांचे व महापालिकेतील भ्रष्टाचाराचे केलेले वस्त्रहरण, ठेकेदारी, टक्केवारीसाठी दोन आमदार, त्यांच्या बगलबच्च्यांमध्ये होत असलेली लूटमार, इतिहासात पहिल्यांदाच लाच प्रकरणी भाजपच्या पदाधिका-यांना झालेली अटक आदींमुळे अब्रूचे खोबरे झालेल्या सत्ताधा-यांनी आयुक्तांवर केलेले आरोप हास्यास्पद आहेत. भ्रष्टाचारावरून जनतेचे लक्ष विचलीत करण्यासाठी रचलेले हे षड्यंत्र आहे. बदनाम झालेल्या व अपयशी ठरलेल्या भाजपचे आयुक्तांवर आरोप म्हणजे ‘उलटा चोर कोतवाल को डांटे’ असा प्रकार असल्याचे काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम यांनी म्हटले आहे.
महापौर उषा ढोरे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी आयुक्त राजेश पाटील यांच्या कार्यपध्दतीवर टिका करत ‘आयुक्त विकास कामांना अडथळा निर्माण करतात असे आरोप केले होते. महापौरांचे व शहरातील भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांचे आयुक्तांवरील रोषाचे कारण काही वेगळेच आहे. पण आत्ता ते वेगळेच कारण पुढे करत आयुक्तांना लक्ष करत आहेत; मात्र दर्शविलेल्या निमित्त कारणांसाठी रोष व्यक्त करण्याची वेळ चुकल्याने महापौरांच्या टिकेमागील वेगळे कारण उघड होत आहे, असेही कदम यांनी म्हटले आहे.
शहरातील जनता सुज्ञ आहे. या जनतेने आजवर भाजपाच्या नेतृत्वाखाली असलेल्या कार्यकाळात मागील साडेचार वर्षांपासून झालेला भ्रष्टाचार पाहिला आहे. शास्तीकराच्या नावाने दिलेली खोटी आश्वासने पाहिली आहेत. स्मार्ट सिटीच्या नावाखाली सुरू असलेली ‘डार्क लूट ‘अनुभवली. कोरोना विषाणूंच्या काळात केलेले चुकीचे नियोजन त्यात झालेली प्राणहानी व त्यात सुध्दा केलेला भ्रष्टाचार ही जनतेने पाहिले आहे. कृत्रिम पाणी टंचाई व टँकर राज ही साखळी, शिक्षण मंडळातील बेधुंद व चुकीची खरेदी, एफडीआर घोटाळा, लाचलुचपत विभागाची धाड व रंगेहाथ पकडलेले स्थायी समितीचे विद्यमान सभापती व कर्मचारी, पर्यावरणाचे प्रश्न, नद्यांची स्वच्छता, आरोग्यसुविधा, काँक्रिट रोडमधील भ्रष्टाचार, निगडीत मृतदेहाची झालेली विटंबना, यासह इतरही अनेक अनियोजित घटना व बाबींच्या संदर्भात महापौर का बोलत नाहीत ? हा जनतेचा सवाल मी काँग्रेसकडून महापौरांना जाहीरपणे विचारत आहे. यास कोण जबाबदार आहे ? याचे उत्तर महापौरांनी द्यावे, असे कदम यांनी ठणकाऊन विचारले आहे.
कोविड काळात आर्थिक फटका बसलेल्या गोरगरीब कष्टक-यांना तीन हजार रुपये देण्याचे गाजर दाखविण्यात आले. ही मदत देण्यात महापौरांना अपयश आले. वाहन चालक प्रशिक्षणावरून आयुक्तांना जबाबदार धरण्याचा नैतिक अधिकार तुम्हाला नाही. तुम्हाला पदोपदी आलेल्या आपयशाचे खापर आयुक्तांवर फोडून काहीही साध्य होणार नाही. तुमच्या फसव्या, खोट्या व धादांत बोगस आश्वासनांमुळे शहरातील तमाम नागरिकांची फसवणूक झाली आहे. या फसवणुकीची जबाबदारी स्वीकारून आपण महापौर पदाचा त्वरीत राजीनामा द्यावा, अशी मागणी डॉ. कदम यांनी केली आहे.