ध्येय, चिकाटी आणि सातत्य ज्याच्या अंगी तो युवक जीवनात नक्कीच यशस्वी होतो – अमित गोरखे
पिंपरी (प्रतिनिधी) – ध्येय ,चिकाटी आणि सातत्य या त्रीसुत्री वर काम करणारा युवक यशस्वीच होतो, असे प्रतिपादन राष्ट्रवादी युवा पुरस्कार विजेते अमित गोरखे यांनी केले आहे.
स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त नोव्हेल इन्स्टिट्यूटच्या वतीने अमित गोरखे यांचा संवाद आयोजित केला होता. त्याप्रसंगी त्यांनी ऑनलाइन वर्च्युअल मीटिंगमधून युवकांशी संवाद साधला. पाचशेपेक्षा जास्त तरुणवर्ग उपस्थित होता.
गोरखे म्हणाले की, युवकांनी डोळे उघडे ठेवून स्वप्न पाहिले, त्याचबरोबर ध्येय निष्ठा आणि चिकाटी या त्रिसूत्रीवर सातत्याने काम केले तर तो युवा निश्चित जीवनात यशस्वी होतो. स्वामी विवेकानंद यांनी भारताच्या सांस्कृतिक वारसा संपूर्ण जगामध्ये आपल्या प्रतिभाशाली वक्तृत्वाच्या जोरावर पसरविला. त्यांची 12 जानेवारीला जयंती साजरी केली जाते. तो दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो.
आजच्या युवकांनी कोरोना काळ याला सकारात्मक भावनेने घेऊन या काळात जास्तीत जास्त वेळ अभ्यास, योग साधना आत्मचिंतन या गोष्टींकडे लक्ष देऊन आपल्या अभ्यासाबरोबर चालू घडामोडी विषयी नॉलेज वाढवावे. येणाऱ्या काळामध्ये स्पर्धात्मक परीक्षांचा अभ्यास करून त्यावर विजय संपादन करण्यासाठी ध्येय ठेवले पाहिजे. जेणेकरून येणारा काळ युवकांसाठी प्रेरणादायी ठरेल, असेही गोरखे म्हणाले.
युवकांना प्रत्येक गोष्टीत कष्टाचे चीज आणि खडतर काम करण्याची सवय ही पालकांनी लावली पाहिजे. कुठलीही गोष्ट सहज युवा पिढीला मिळाली तर त्याचे मूल्य करू शकत नाहीत. त्यामुळे जीवनाचा खडतर खडतर प्रवास ज्या युवकांना मिळाला तो आयुष्यात यशस्वी होऊ शकतो, असे ते म्हणाले.
प्राचार्य वैभव फंड यांनी आभार मानले.