पिंपरी-चिंचवडसह दिघीतील प्रमुख चौकांना वीर मावळ्यांची नावे द्यावीत

  • राष्ट्रवादीचे अमोल देवकर व ज्ञानेश आल्हाट यांची मागणी
  • आयुक्त राजेश पाटील यांना दिले निवेदन

पिंपरी (प्रतिनिधी) – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सोबत निधड्या छातीने स्वराज्य निर्मितीसाठी अनेक वीर मावळे लढले आहेत. अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. मावळ्यांची शौर्यगाथा पुढील पिढीला ज्ञात होणे गरजेचे आहे. त्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरासह दिघी येथील मुख्य चौकांना वीर मावळ्यांची नावे द्यावीत, अशी मागणी राष्ट्रवादी युवकचे पिंपरी-चिंचवड सरचिटणीस अमोल देवकर, विलास लांडे युवा मंचचे ज्ञानेश आल्हाट यांनी केली आहे.

यासंदर्भात पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यात देवकर आणि आल्हाट यांनी म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे स्वराज्य निर्माण करण्याचे स्वप्न पाहिले. ते सत्यात उतरविण्यासाठी मावळ्यांनी प्राणाची बाजी लावली. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य निर्मितीमध्ये मावळ्यांचा मोठा वाटा आहे. या मावळ्यांचा इतिहास पुढील पिढीला ज्ञात व्हावा. मावळ्यांची शौर्यगाथा प्रेरणादायी ठरावी यासाठी त्यांची नावे शहरातील प्रमुख चौकासह दिघीतील चौकांना देण्यात यावीत.

दिघीतील या चौकांना मावळ्यांची नावे द्यावीत

महत्त्वाच्या चौकांना थोर व्यक्तींची आणि मावळ्यांची नावे देण्याची बाब सर्वांसाठीच प्रेरणादायी ठरणारी आहे. मावळ्यांची नावे चौकाना देऊन व त्यासोबत मावळ्यांची थोडक्यात माहिती फलक देखील उभारावे. दिघीमध्ये जकात नाका येथे नरवीर तानाजी मालुसरे चौक व त्याच ठिकाणी त्यांचे स्मारक उभारण्यात यावे. हनुमान मार्केट जवळ सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे नाव द्यावे. तसेच हॉरिझन स्कूल जवळ वीर शिवा काशिद, दिघी पोलाईट पॅनोरामा जवळील चौकाला वीर जीवा महाले यांचे नाव द्यावे, अशी मागणी देवकर आणि आल्हाट यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Share to