मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी राष्ट्रपतींना एक लाख पत्र पाठविणार

  • शिवसेना पिंपरी चिंचवड संपर्क प्रमुख एड. वैभव थोरात यांचा निर्धार
  • पत्राच्या माध्यमातून लोकचळवळ तिव्र करा, खासदार बारणे यांचे आवाहन

पिंपरी (प्रतिनिधी) – मराठी भाषा ही महाराष्ट्राची शान आहे. राज्य सरकार व प्रशासकीय कामकाज मराठी भाषेतच चालते. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी शिवसेना कायमच पाठपुरावा करत आलीय. परंतु, केंद्रातील कोडग्या सरकारांनी मराठी भाषेच्या बाबतीत कायमच वक्रदृष्टी ठेवली. केंद्रातील सरकारला अभिजात भाषेचा निर्णय घेण्यास भाग पाडण्यासाठी आपण राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पिंपरी-चिंचवड शहरातून एक लाख पत्र पाठविण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी सर्वांनी पत्र लिहावीत, असे आवाहन सिनेटचे सदस्य तथा पिंपरी-चिंचवड संपर्क प्रमुख ऍड. वैभव थोरात यांनी केले.

पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना येणा-या अडचणी सोडविण्यासाठी खासदार श्रीरंग बारणे यांच्या पुढाकाराने चिंचवड येथील ऑटो क्लस्टरमध्ये गुरुवारी (दि. 3) सकाळी 11 ते दुपारी दीड या दरम्यान जनता दरबार घेण्यात आला. जनता दरबारमध्ये लोकांचे प्रश्न सोडविण्याबरोबरच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी पंत्र संकलन पेटी ठेवण्यात आली होती. त्यामध्ये जास्तीतजास्त नागरिकांनी मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळवण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहिन्याचे आवाहन थोरात यांनी केले होते. त्याला प्रतिसाद देत शेकडो नागरिकांनी पत्र लिहून संकलन पेटीत जमा केली.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले की, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवा यासाठी लोकसभेच्या सभागृहात वारंवार तारांकीत प्रश्न उपस्थित करत आलो आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडेही त्यासंदर्भात पाठपुरावा सुरू आहे. या सर्व प्रक्रियेला विलंब होत असून याबाबत तातडीने निर्णय होण्यासाठी लोकचळवळ तिव्र होण्याची गरज आहे. एड. वैभव थोरात यांच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवडमधून एक लाखाहून अधिक पत्र पाठवल्यास मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत केंद्रीय स्तरावर नक्कीच हालचाली होतील.

ऍड. वैभव थोरात म्हणाले की, मराठी भाषा ही साता समुद्राच्या पलीकडे जाऊन पोहचली आहे. याचा महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला सार्थ अभिमान आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाच पाहिजे. त्यासाठी आपल्या सर्वांचा पाठिंबा असणे गरजेचे आहे. मराठी भाषेचे वैभव संत महात्मे, साहित्यिक व समाजसुधारकांनी जसे वाढविले, ते जतन करणे आपले कर्तव्य आहे. त्यासाठी राष्ट्रपतींना पिंपरी-चिंचवडमधून एक लाख पत्र पाठविण्याचा आपला निर्धार आहे. या लढ्यात सहभागी होऊन मराठी भाषेसाठीचा लढा आणखीन तिव्र करूयात, असेही थोरात यावेळी म्हणाले.

शेकडो शिवसैनिक व नागरिकांनी लिहिले पत्र

एड. वैभव थोरात यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शेकडो शिवसैनिक व नागरिकांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी पत्र लिहिली. सर्व पत्र संकलन पेटीत जमा करण्यात आली. उद्यापासून संपूर्ण शहरातून जमा होणारी पत्र संकलन पेटीत साठवून ती राष्ट्रपतींना पाठविण्यात येणार आहेत.

Share to