शिवसेनेशिवाय कोणाचाच महापौर होऊ शकत नाही, अशी ताकद निर्माण करा – उपनेते रविंद्र मिर्लेकर
- सत्ताधारी भाजपाला नागरिकांच्या एक-एक रुपयाचा हिशोब द्यावा लागेल – अॅड. वैभव थोरात
- भोसरीतून भाजपाला हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही – केसरीनाथजी पाटील
- कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत शिवसेना नेत्यांची भाजपावर सडकून टिका
पिंपरी (प्रतिनिधी) – राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची भाजपा वाट पाहत आहे. त्यांनी कितीही प्रयत्न केला तरी कोणाच्या बापाला हे सरकार पडणार नाही. त्यातच महापालिका निवडणुका सहा महिने लांबणीवर गेल्याची चर्चा केली जात आहे. निवडणूक पुढे जाऊ दे अथवा वेळेत होऊदेत, शिवसेनेची विचारधारा घराघरात पोहचली पाहिजे. मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांनी नागरिकांसाठी घेतलेले महत्वाचे निर्णय, राबविलेल्या योजना, केलेली विकासकामे ही नागरिकांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी प्रत्येक शिवसैनिकावर आहे. आपण केलेल्या कामाच्या जोरावर महापालिका निवडणुकीत जास्तीतजास्त नगरसेवक निवडूण आणायचे आहेत. काहीही झाले तरी शिवसेनेशिवाय कोणाचाच महापौर होऊ शकत नाही, अशी ताकद निर्माण झाली पाहिजे. त्यासाठी सर्वांनी वेगाने कामाला लागावे, असे आवाहन शिवसेना उपनेते तथा पश्चिम महाराष्ट्र समन्वयक रविंद्रजी मिर्लेकर यांनी कार्यकर्त्यांना केले.
पिंपरी-चिंचवडमधील कार्यकर्त्यांची आढावा बैठक नुकतीच आकुर्डी येथील शिवसेना भवनात पार पडली. बैठकीत उपनेते मिर्लेकर यांच्यासह पिंपरी-चिंचवडचे संपर्क प्रमुख अॅड. वैभवजी थोरात, भोसरीचे संपर्क प्रमुख केसरीनाथजी पाटील, माजी आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार, शिवसेनाप्रमुख नगरसेवक अॅड. सचिन भोसले, जिल्हा संघटिका शैला खंडागळे, महिला संघटिका उर्मिला काळभोर, चिंचवड विधानसभा प्रमुख अनंत को-हाळे, शहर संघटक संतोष सौंदणकर, उपजिल्हा संघटिका वैशाली मराठे, पिंपरी विधानसभा प्रमुख राजेश वाबळे, शहर संघटक संतोष चंदनकर, बशीर सुतार, रोमी संधू ,अमोल निकम, नितीन बोंडे, सतिष मरळ, भाविक देशमुख, पार्थ गुरव, संदीप बालके, महेश कलाल, सरिता साने, भाग्यश्री मस्के, सय्यद पटेल, माऊली जगताप, सुधाकर नलावडे, गणेश आहेर, प्रदीप दळवी, गोरख पाटील, वैशाली कुलथे, रजनी वाघ, महादेव गव्हाणे आदी शिवसैनिक उपस्थित होते.
अॅड. वैभवजी थोरात म्हणाले की, पिंपरी-चिंचवडमध्ये प्रत्येक शिवसैनिक वेगाने कामाला लागला आहे. सामान्यतल्या सामान्य कार्यकर्त्याला विश्वासात घेऊन तो रहात असलेल्या भागात पक्षाचे काम करण्यावर भर द्यावा. शिवसैनिकांचे हे काम चांगले असले तरी याहून अधिक कामे जबाबदारीने पार पाडण्याचा निश्चय करा. शिवसेनेची विचारधारा घराघरात पोहोचविण्याबरोबरच पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ताधारी भाजपाने केलेल्या चुकीच्या कामांबाबत नागरिकांना जागरूक केले पाहिजे. भाजपाने गेल्या पाच वर्षात पालिकेच्या प्रत्येक निविदेत भ्रष्टाचार केला. सल्लागाराच्या आडून नागरिकांच्या करोडो रुपयांवर डल्ला मारला. त्याची पोलखोल नागरिकांच्या समोर करण्यासाठी सर्वांनी धाडसाने कामाला लागले पाहिजे, असेही थोरात यांनी म्हटले आहे.
केसरीनाथजी पाटील म्हणाले की, भोसरी हा भाजपाचा गड असल्याच्या आवया ठोकल्या जात असल्या तरी या गडाला सुरूंग लावण्याचा कार्यक्रम आपल्याला आखायचा आहे. भोसरी विधानसभेत भाजपाच्या तुलनेत शिवसेनेची मोठी ताकद आहे. भाजपाचा भ्रष्टाचार भोसरीतल्या जनतेला माहीत झाला आहे. विकासकामांच्या नावाखाली त्यांनी नागरिकांची घोर फसवणूक केली आहे. हे आता नागरिकांना कळून चुकले आहे. नागरिकांचे पैसे खाणा-या भाजपाला भोसरीतून हद्दपार करण्यासाठी प्रत्येक शिवसैनिकाने नेटाने कामाला लागले पाहिजे. संघटन वाढत असून घराघरात जाऊन नागरिकांना पक्षाशी जोडण्याचे शिवधनुष्य कार्यकर्त्यांनी खांद्यावर घ्यावे. येणा-या निवडणुकीत कितीही बलाढ्य शत्रु असला तरी त्याला घरी बसविल्याशिवाय राहायचे नाही, असा निश्चिय पाटील यांनी केला.
अॅड. सचिन भोसले म्हणाले की, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधा-यांनी नागरिकांची घोर फसवणूक केली आहे. कोविड काळात कष्टक-यांना तीन हजार रुपये अनुदान देण्याचा शब्द भाजपाच्या महापौरांनी दिला होता. आजतागायत शहरातील एकाही कष्टक-याला तीन हजार रुपयांची मदत मिळाली नाही. प्लाझ्मा दान करणा-यांनासुध्दा अर्थसहाय्य देण्याचे आश्वासन दिले होते. एकाही प्लाझ्मादात्याला मदत मिळाली नाही. आश्वासने देऊन नागरिकांना भुलवायचे आणि दुसरीकडे स्मार्ट सिटी, अर्बन स्ट्रीट, २४ तास पाणी पुरवठा, आंध्र, भामा असखेड पाणी पुरवठा अशा योजनांमधून कोट्यवधी रुपये लाटायचे, त्याचा हिशोब महापालिका निवडणुकीत भाजपाच्या पदाधिका-यांना नागरिक विचारल्याशिवाय राहणार नाहीत.