केंद्र सरकारकडून देशातील कोविड निर्बंध मागे मात्र मास्क अनिवार्य
मुंबई – कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने बुधवारी आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत असणारे निर्बंध उठवण्याचा निर्णय घेतला, परंतु “आम्हाला अजूनही परिस्थितीकडे लक्ष देणे आवश्यक आहे” असा इशारा दिला. यासंबंधीचे आदेश सर्व राज्यांना कळवण्यात आले असल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले.
गृह मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (NDMA) सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कडक प्रतिबंधात्मक उपाय योग्यरित्या बंद करण्याचा सल्ला दिला आहे. परंतु, लसीकरण आणि कोविड नियमांबाबत सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. फेस मास्क वापरणे आणि हाताची स्वच्छता राखणे देखील गरजेचे आहे, असे जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
गृहसचिव अजय भल्ला यांनी राज्यांना दिलेल्या निवेदनानुसार: “गेल्या 24 महिन्यांत, रोगनिदान, ट्रेसिंग , कोविड संपर्क शोधणे, उपचार आणि लसीकरण, रुग्णालयातील पायाभूत सुविधा आणि सामान्य जनतेने महामारीच्या व्यवस्थापनाच्या विविध पैलूंसाठी महत्त्वपूर्ण क्षमता देशामध्ये विकसित झाली आहे. कोविड-योग्य वर्तनाबद्दल जागरुकतेची उच्च पातळी देखील लोकांच्यात तयार झाली आहे. परिस्थितीतील एकूण सुधारणा आणि साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी सरकारची तयारी लक्षात घेतल्यानंतर, NDMA ने असा निर्णय घेतला आहे की मुदत संपल्यानंतर कोविड प्रतिबंधात्मक उपायांसाठी DM कायद्यातील तरतुदी लागू करण्याची गरज भासणार नाही.” या आदेशाची मुदत ३१ मार्च रोजी संपत आहे.