आमदार महेश लांडगे यांचे व्हिजन 2020चे गाजर दिवाळखोरीत, रेडीरेकनरमुळे ‘दूध का दूध और पानी का पानी’
- भाजपा पदाधिका-यांचे भोसरीकडे सर्वाधिक दुर्लक्ष
- राष्ट्रवादी शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांची सडकून टिका
पिंपरी (प्रतिनिधी) – भोसरी विधानसभा मतदारसंघात विविध विकासकामे केल्याचा दावा आमदार महेश लांडगे आणि भारतीय जनता पक्षाकडून केला जात आहे. या दाव्याची पोलखोल नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या रेडीरेकनरच्या दरामुळे झाली आहे. विकासाच्या नावाखाली केवळ गाजरे दाखविण्याचे काम करणाऱ्या आमदारांच्या मनमानी आणि निष्क्रीय कारभारामुळे भोसरीचा विकास म्हणजे पाण्यावरचे बुडबुडेच ठरल्याचा आरोप राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केला आहे.
राज्य शासनाने नुकतेच रेडीरेकनरचे दर जाहीर केले आहेत. ज्या भागात सर्वाधिक विकास होतो त्या भागामध्ये रेडीरेकनरचा दर हा अधिक असतो. रस्ते, पाणी, वीज यासोबतच दळणवळणाची साधने व राहण्यायोग्य वातावरण असलेल्या भागाचा सर्वाधिक विकास होतो. पिंपरी-चिंचवड शहरातील रेडीरेकनरचे दर जाहीर झाल्यानंतर गेल्या पाच वर्षांत शहरात किती असमान विकास झाला, हे देखील समोर आले आहे. याबाबत अजित गव्हाणे यांनी विशेषता भाजपा शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांच्यावर सडकून टीका केली आहे.
अजित गव्हाणे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, भाजपाचे शहराध्यक्ष तथा भोसरीचे आमदार महेश लांडगे हे महापालिकेचे कारभारी आहेत. भोसरीतील मतदारांनी अत्यंत विश्वासाने त्यांना दोनवेळा विधानसभेत पाठविले. मात्र, त्यांनी सर्वसामान्य नागरिकांना केवळ विकासाची स्वप्ने दाखविली. मोठा गाजावाजा केलेल्या व्हिजन 2020 हे केवळ गाजरच ठरले. आता हे गाजरदेखील दिवाळखोरीतच निघाल्याचे रेडीरेकनच्या दरावरून स्पष्ट झाले आहे, असे गव्हाणे यांनी म्हटले आहे.
रेडीरेकनच्या दराचा विचार करावयाचा झाल्यास वाकड, पिंपळे सौदागर, पिंपळे निलख या परिसरातील निवासी इमारतींचा दर 4,900 ते 9,200 रुपये प्रति चौरस फुट आहे. तर मोशी, तळवडे, चिखलीचा विचार केल्यास हाच दर 3,900 ते 6,000 हजार रुपये प्रति चौरस फुट आहे. यावरूनच भोसरी विधानसभेचा विकास किती मागासलेला आहे, हेच सिद्ध होत आहे. राष्ट्रवादीने महापालिकेत सत्ता असताना शहराचा समान विकास करण्यावर भर दिला. मात्र महापालिकेत सत्ता आल्यानंतर भाजपच्या कारभाऱ्यांनी सर्वाधिक दुर्लक्ष हे भोसरी विधानसभेतील विविध गावांकडे केले. त्यामुळे भोसरी, चऱ्होली, तळवडे, चिखली, मोशी ही गावे विकासापासून दूरच राहिल्याचे रेडीरेकनरच्या दरावरून स्पष्ट झाले आहे. सर्वात कमी दर हा भोसरी विधानसभेतील सर्वच भागांचा असावा हे भाजपवर विश्वास दाखविणाऱ्या नागरिकांचे दुर्देवच म्हणावे लागेल, अशी खंत देखील गव्हाणे यांनी व्यक्त केली आहे.
प्राधिकरणाने विकसीत केलेला इंद्रायणीनगरचा परिसर वगळता गेल्या पाच वर्षांत या परिसरात सत्तेच्या आडून भाजपच्या नेत्यांनी निर्माण करण्यात आलेल्या दहशतीमुळे विकासकामे अपेक्षित वेगाने झाली नाहीत. कोणत्याही नामांकित इंडस्ट्रीची नव्याने पायाभरणी झाली नाही. एकही नवा व्यवसाय नावारुपाला आलेला नाही. सत्तेच्या आडून निर्माण करण्यात आलेल्या दहशतीमुळे भोसरी विधानसभेतील अनेक गावे आजही विकासापासून वंचित राहिलेली असून याला आमदार महेश लांडगे हेच जबाबदार असल्याचेही गव्हाणे यांनी म्हटले आहे.
2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाचे आमदार महेश लांडगे यांनी भोसरीकरांना व्हिजन 2020 चे स्वप्न दाखविले होते. मात्र, त्या व्हिजनचे काय झाले, हे बोलण्याची धमक आमदारांमध्ये राहिलेली नाही. रोज नवीन गाजरे दाखवायची आणि त्यातून स्वत:चा स्वार्थ साधायचा, हा एकमेव उद्योग या महाशयांकडून सुरू आहे. भोसरीला विकासापासून दूर ठेवण्याचे पाप करणाऱ्या भाजपला आणि आमदार महेश लांडगे यांना भोसरीतील जनता कदापी माफ करणार नाही, येत्या महापालिका निवडणुकीत भोसरीतील सुज्ञ जनता आमदार लांडगे यांच्या नेतृत्वाला कायमचा पूर्णविराम दिल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही अजित गव्हाणे यांनी प्रसिध्दीपत्रकातून व्यक्त केला.