शरद पवार मुंबई बॉम्बस्फोटाबाबत का खोटं बोलले ?, त्यामागे पवारांचं हे होतं षडयंत्र
मुंबई – माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर ट्विटरच्या माध्यमातून टीका केली. एक नव्हे तब्बल १४ ट्वीट्स करत फडणवीसांनी मुंबई बॉम्बस्फोटाच्या इतिहासाचा दाखला देऊन शरद पवारांवर निशाणा साधला. त्यानंतर शरद पवारांनी एका उत्तरातच फडणवीसांच्या ढिगभर ट्विट्सची हवा काढली आहे. जळगावमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी अत्यंत मार्मिक शब्दांत मुंबई बॉम्बस्फोटाबाबत आपण घेतलेला निर्णय कसा फायदेशीर ठरला हे त्यांना सांगितले.
देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या ट्वीटपैकी एका ट्वीटमध्ये मुंबई बॉम्बस्फोटांवेळी शरद पवारांनी अतिरिक्त बॉम्बस्फोटाची चुकीची माहिती दिल्याचा उल्लेख केला आहे. १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटांनंतर १३ वा बॉम्बस्फोट हा मुस्लिम वस्तीत झाल्याचे खोटे सांगितल्यासंदर्भातही फडणवीसांनी प्रश्न उपस्थित केला. “जेव्हा मुंबईत १२ स्फोट झाले, तेव्हा शरद पवारांनी मुस्लीम भागात झालेला १३वा स्फोट शोधून काढला होता. कायदा आणि सुव्यवस्थेऐवजी लांगुलचालन करण्याला त्यांचं प्राधान्य होतं”, असं फडणवीस आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत. त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, देवेंद्र फडणवीसांनी दिलेली आकडेवारी खरी आहे. “मुंबईच्या बॉम्बस्फोटांची माहिती देताना १२ स्फोट झालेले असताना १३ ठिकाणी झाले असल्याचं मी सांगितलं, असे ते म्हणाले. मुस्लीम भागाचं नाव घेतल्याचंही सांगितलं. ते १०० टक्के खरं आहे. हे मी केलं”, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
पवारांनी का सांगितलं असं ?
१२ ऐवजी मुस्लीम भागात १३वा स्फोट झाल्याचं आपण का सांगितलं याचं कारण देखील पवारांनी यावेळी दिलं. “ज्या १२ ठिकाणी बॉम्बस्फोट झाले, ती हिंदुंची ठिकाणं होती. हा स्फोट कुणी केला? त्याचा शोध मी घेतला. त्यासाठी जे साहित्य वापरलं, ते मी स्वत: जाऊन बघितलं. जो पहिला बॉम्बस्फोट झाला, ते साहित्य मी पाहिलं. ते हिंदुस्थानात तयार होत नाही, ते कराचीत तयार होतं हे मला माहिती होतं. याचा अर्थ त्यामागे बाहेरची शक्ती होती. त्यामुळे कुणीतरी शेजारचा देश हिंदू-मुस्लिमांमध्ये वाद वाढवायचं काम आणि मुंबईत आग लागावी अशा प्रयत्नात होता. स्थानिक मुस्लीम त्यात नव्हते. पण मी बारावं ठिकाण मोहम्मद अली रोड सांगितल्यामुळे जातीय दंगली करण्याची ज्यांची इच्छा होती, त्या दंगली झाल्या नाहीत”, यासाठी मला असं बोलावं लागलं, ते मुंबईच्या हितासाठी मी बोललो, असे शरद पवारांनी नमूद केलं.
त्यांची विधानं फाशी गांभीर्यानं घेण्याची गरज नाही
“हिंदू-मुस्लीम दोघेही एकत्र आले आणि या परकीय शक्तीच्या विरुद्ध आपण उभं राहावं या मताशी आले. त्यावेळी चौकशीसाठी श्रीकृष्ण आयोग नेमण्यात आला. त्यांच्याकडून मला समन्स आले. मला विचारलं की तुम्ही असं का म्हणाले? मी म्हटलं हे ऐक्य राहावं म्हणून बोललो. त्यांच्या अहवालात त्यांनी स्पष्ट म्हटलं आहे की पवारांनी अशी भूमिका घेतली नसती, तर मुंबईत आग लागली असती. त्यामुळे त्यांचा हा निर्णय समाजाच्या हिताचा होता. पण हे तारतम्य ज्यांना कळत नाही, ज्यांना प्रश्नाचं गांभीर्य कळत नाही, त्यांनी काही विधानं केली असतील, तर त्याची फारशी नोंद घेण्याचं कारण नाही”, असं देखील शरद पवार यावेळी म्हणाले.