‘अजितदादांना का बोलू दिलं नाही ?’, देहू संस्थानच्या अध्यक्षांनी केला खुलासा म्हणाले मोदींनीच…

पुणे : देहू येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना बोलण्याची संधी देण्यात आली नाही. हा महाराष्ट्राचा अपमान आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत नाराजी व्यक्त केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देहू येथील कार्यक्रमात राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना बोलण्याची संधी दिली. परंतु, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांना बोलू दिले नाही. यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीटच्या माध्यमातून प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

यावर देहू संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, भाषणाबाबत मला देखील कोणतीच कल्पना नव्हती. दिल्लीमध्ये भाषण कोणाचे होणार हे प्रोटोकॉलनुसार ठरलं होतं. मात्र, वारकरी संप्रदायच्या कार्यक्रमात कोणतंही राजकारण येऊ नये, असं मला वाटतं, अशी प्रतिक्रिया देहू संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देहू याठिकाणी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिरांचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळी व्यासपीठावर नरेंद्र मोदी यांच्यासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. तुकाराम महाराज मंदिराच्या विश्वस्तांच्या भाषणानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं भाषण झालं. पण यावेळी अजित पवार यांना भाषण करू न दिल्याने राजकीय वर्तुळात उलट सुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

Share to