कोरोना महामारीच्या कालखंडानंतर देहूनगरीत दोन वर्षांनी दुमदुमला ‘ज्ञानोबा तुकाराम’चा गजर
- तुकोबांच्या पालखी सोहळ्याचे पंढरीकडे प्रस्थान
पिंपरी (प्रतिनिधी) – विठ्ठलाच्या भेटीची आस लागलेल्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या 337 व्या पालखी सोहळ्यासह वैष्णवांच्या मेळ्याने आज पंढरीकडे प्रस्थान ठेवले. ‘ज्ञानोबा तुकाराम’चा नामघोष करत टाळ मृदंगाच्या निनादात महाराष्ट्रातून देहूत दाखल झालेल्या दिंड्या दुडूदुडू चालू लागल्या. कोरोना महामारीच्या दोन वर्षांच्या कालखंडानंतर वारीचा प्रत्यक्ष सोहळा पाहायला मिळाल्याने भक्तांची मने तल्लीन झाली.
पालखी प्रस्थानासाठी देहूनगरीला अध्यात्मिक स्वरूप प्राप्त झाले होते. पहाटे पाच वाजल्यापासून शिळा मंदिर, विठ्ठल रखुमाई मंदिरात महापूजा आणि इतर विधी झाले. सकाळी दहा ते दुपारी बारा यावेळेत पालखी सोहळा काल्याचे कीर्तन आणि इनामदार वाड्यात तुकोबांच्या पादुकांचे पूजन झाले. दुपारी चारच्या सुमारास पालखीने पंढरीकडे प्रस्थान ठेवले. आज देहूतील इनामदार वाड्यातच पालखी मुक्कामी राहणार आहे.

या सोहळ्याचे साक्षिदार होण्यासाठी मावळचे खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील शेळके, कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, नगराध्यक्षा स्मिता चव्हाण, देहू संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे आदी उपस्थित होते.

पालखी सोहळा उद्या मंगळवारी पिंपरी-चिंचवड शहरात दाखल होणार आहे. आकुर्डी येथे पालखी मुक्कामी राहणार आहे. विठोबाच्या भेटीची आस लागलेल्या लाखो वारकरी मंडळींचा मेळा पंढरीच्या वाटेवर चालत आहे. राज्य सरकारने कोरोनाचे निर्बंध हटवल्यामुळे पालखी सोहळ्यातील वारक-यांचा मेळा मोकळ्या वातावरणात निघाला आहे. राज्य सरकारने पालखी सोहळ्याला परवानगी दिल्यामुळे समस्त वैष्णवांमध्ये मोठा उत्साह दिसत आहे. एकंदरीतच पालखी सोहळ्यातील वातावरण आनंददायी दिसत आहे.
