महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज, या जिल्ह्यांना बसणार तडाखा

मुंबई – राज्यात मंगळवारच्या (31 ऑगस्ट) जोरदार पावसाच्या हजेरीनंतर आज (1 सप्टेंबर) पावसाचा जोर काहीसा कमी झालेला दिसत असला तरी अनेक ठिकाणी पावसाची रिमझिम सुरू आहे. पुराने थैमान घातलेल्या चाळीसगाव, कन्नड भागातही पावसानं काहीशी उघडीप दिली असून या भागातील जीवनमान पूर्ववत होत आहे. पाण्याखाली गेलेले पूलही वाहतुकीसाठी सुरू होत आहेत. असं असलं तरी हवामान खात्यानं 2-3 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे पावसाची शक्यता कायम आहे.

पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतल्याने चाळीसगावमधील परिस्थिती पूर्वपदावर आली आहे. तितूर नदीवरील घाटरोड पूल वाहतुकीसाठी खुला झालाय. रात्रीपर्यंत हा पूल पाण्याखाली होता. चाळीसगाव शहराच्या मध्यभागी असणारा हा शहराला जोडणारा पूल आहे. आता नदीचं पाणी ओसरल्यानं परिसरात मोठ्या प्रमाणावर कचरा साचलाय.

वसई विरार नालासोपाऱ्यात मध्यरात्रीपासून रिमझिमसह अधूनमधून जोरदार पाऊस सुरू आहे. सकाळच्या वेळेत अधूनमधून जोरदार पाऊस पडल्यानं नालासोपारामधील आचोले रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. रस्त्यावर गुडघाभर पाणी साचलं आहे. आचोले रस्ता हा वसईला जाणारा मुख्य रस्ता असल्याने सकाळी कामावर जाणाऱ्या वाहनधारक, नागरिकांना यातून मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागत आहे.

नालासोपारा पूर्व सेंट्रल पार्क, टाकी पाडा, ओसवाल नगरी या रस्त्यावर ही सकल भागात काही प्रमाणात पाणी साचले आहे. आभाळ पूर्णपणे भरलेले असून दिवसभरात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. बुलडाणा जिल्ह्यातही ढगाळ वातावरण आहे. जिल्ह्याच्या काही भागात रिमझिम पाऊस पडतोय.

मुंबई हवामान विभागाचा अंदाज

मुंबई हवामान विभागाने मंगळवारी (31 ऑगस्ट) सॅटेलाईट आणि रडार इमेजेसच्या आधारे महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केलाय. पुणे, जळगाव, अहमदनगर, सोलापूर, औरंगाबाद, जालना, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी आणि बीडमध्ये पावसाचा जोर अधिक असेल असंही नमूद करण्यात आलंय. पालघर, रायगड, ठाणे या कोकणातील भागात विजेचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.

हवामान विभागाचे अधिकारी के. एस. होसाळीकर म्हणाले, “छत्तीसगडवर 30 ऑगस्टला कमी दाबाचे क्षेत्र आहे. 15 अंश उत्तरवर पूर्व-पश्र्चिम शियर जोन आहे. याचा प्रभाव म्हणून महाराष्ट्र राज्यासाठी IMD पुढील 3-4 दिवसांसाठी काही इशारे देत आहे. काही ठिकाणी मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता आहे. यात मुंबई, ठाणे, उत्तर कोकणाचाही समावेश आहे.”

भिवंडीत मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस

भिवंडी परिसरात मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस पडतोय. त्यामुळे सखल भागात पाणी साचले आहे. तिनबत्ती भाजीमार्केट, बाजार पेठेतील दुकानात पाणी शिरले आहे. भाजीपाला व्यापाऱ्यांचीही यामुळे तारांबळ झालीय.

Share to