स्पीड ब्रेकरचा अभाव, अतिक्रमण ठरतेय जीवघेणा
- पुणे महापालिका प्रभाग 2 मधील चित्र
- वाहतूक पोलीस, महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष
पुणे / प्रतिनिधी
पुणे महापालिकेच्या आणि वाहतूक पोलीस विभागाच्या दुर्लक्षामुळे प्रभाग क्रमांक 2 मध्ये वाहतूक नियमांचा बोजवारा उडाला आहे. महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड परिसरात स्पीड ब्रेकर करण्याकडे दोन्ही विभागाने दुर्लक्ष केले आहे. तसेच बदामी चौक ते शास्रीनगर चौकापर्यंत अतिक्रमण झाल्याने वाहनांना अडथळा निर्माण होत आहे. परिणामी या परिसरात अपघाताचे प्रमाण वाढत आहे. या बाबत वाहतूक पोलीस विभाग आणि महापालिका प्रशासनाला उपाययोजना राबविण्यात अपयश येत आहे. त्या विरोधात नागरिक तीव्र संताप व्यक्त करत आहे.
येरवडा पोस्ट कार्यालय ते बदामी चौक, शास्त्रीनगर या भागात वाहनांची मोठी वर्दळ असते. कामावर जाण्यासाठी वाहनधारक वेगाने वाहने चालवीत आहेत. नागरी परिसर असल्याने या भागात नागरिकांची देखील सातत्याने ये जा सुरू असते. वाहनधारक बेशिस्तपणे आणि वेगाने वाहने चालवीत आहेत. त्यामुळे या परिसरात स्पीड ब्रेकर बसविणे गरजेचे आहे. त्याबाबत माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी निवेदने देखील दिली आहेत. मात्र अद्याप त्याची अंमलबजावणी झाली नाही. वाहतूक विभाग महापालिकेकडे बोट करत आहे. तर महापालिका प्रशासन स्पीड ब्रेकर करायला उदासीन दिसत आहे.
शांतिरक्षक सोसायटी, बदामी चौक ते शास्त्रीनगर या भागात रस्त्याच्या बाजूला अतिक्रमण झाले आहे. खाऊच्या टपऱ्या लागल्या आहेत. त्या ठिकाणी नागरिक वाहने रस्त्यात उभी करून खाण्यासाठी थांबत आहेत. त्यामुळे या भागातील रस्ता अरुंद होत आहे. वाहनधारकांना वाहने चालविणे जिकिरीचे होत आहे. अडथळे निर्माण झाल्याने अपघातात वाढ होत आहे.
त्यामुळे या भागात स्पीड ब्रेकर बसवून अतिक्रमणे हटविण्याची मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे. वाहतूक पोलीस शाखा तसेच महापालिका प्रशासन यावर उपाययोजना करणार की एकमेकांकडे बोट दाखवून आणखी बळी घेणार असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
- डॉ. सिद्धार्थ धेंडे यांची तत्परता –
महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड येथील ईशान्य मॉल परिसरात सोमवारी (दि. 2) एका दुचाकीस्वाराला बेशिस्त वाहनांमुळे अपघाती जीव गमवावा लागला. अपघात घडल्यानंतर संतप्त नागरिकांनी वाहतूक पोलिसांना घेराव घालून जाब विचारला. या वेळी डॉ. धेंडे यांनी तत्परता दाखवत घटनास्थळी भेट दिली. संबंधित अपघात ग्रस्त युवकाची विचारपूस केली. तसेच सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केल्यानंतर नातेवाईकांना भेटून धीर देण्याचे काम केले. या बरोबरच वाहतूक पोलिसांना नागरिकांच्या भावना सांगून नागरिकांचा राग शांत करण्याचा प्रयत्न केला. तसेच योग्य उपाययोजना राबविण्याबाबत पोलिसांना सूचना दिल्या.
वाहतूक पोलिसांकडून नियमांची अंमलबजावणी नाही –
शास्त्रीनगर कडून येरवडा पोस्टमार्गे जाणाऱ्या अवजड वाहनांना बंदी घालावी यासाठी माजी आमदार जगदीश मुळीक, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, माजी स्थायी समिती सदस्य योगेश मुळीक यांनी पाठपुरावा केला होता. त्यानंतर अवजड वाहनांना बंदी घातल्याचे वाहतूक पोलीस विभागाने जाहीर देखील केले होते. मात्र अद्याप या रस्त्यावर अवजड वाहने येत आहेत. त्यांना बंदी घालण्यात आणि नियमांची अंमलबाजवणी करण्यात वाहतूक पोलीस शाखेला अपयश आले आहे.
–——————-–
प्रतिक्रिया :
शास्त्रीनगर कडून येरवडा पोस्टमार्गे विविध ठिकाणी जाणारी वाहनधारकांची संख्या मोठी आहे. महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड नागरी परिसर असल्यामुळे या ठिकाणी लहान मुले, वयोवृद्ध, नागरिकांची सातत्याने ये-जा असते. त्यामुळे या ठिकाणच्या रस्त्यावर वाहने सावकाश जावीत यासाठी स्पीड ब्रेकरची आवश्यकता आहे. अवजड वाहनांना बंदी घातली आहे. त्याची कडक अंमलबजावणी झाल्यास अपघात टळतील.