पालखी दरम्यान हातगाडी, स्टॉल बंदचा निर्णय, पोलिसांनी दबावतंत्र वापरू नये – काशिनाथ नखाते
पिंपरी – जगद्गुरु संत तुकाराम महाराज व ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याच्या निमित्ताने २१ जून व २२ जून रोजी शहरातून पालखी पंढरी कडे प्रस्थान होत आहे, या पार्श्वभूमीवर पालखीला भाविकांची होत असलेली प्रचंड गर्दी यातून अनुचित प्रकार घडू नये व लाखो भाविकांना व्यवस्थित दर्शन घेता यावे या उदात्त भूमिकेतून पालखीच्या दरम्यान सलग दोन दिवस पालखी मार्गावरील देहू ते पिंपरी चिंचवड पुणे मार्गे सासवड पर्यंत पथारी, हातगाडी, स्टॉलधारक आपला व्यवसाय बंद करून महापालिका व पोलिस प्रशासनाला सहकार्य करण्याचा निर्णय आज झालेल्या महाराष्ट्र हॉकर फेडरेशन व महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाच्या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला.
यावेळी कामगार नेते काशिनाथ नखाते, कार्याध्यक्ष इरफान चौधरी ,राजू बिराजदार, अनिल बारवकर ,फरीद शेख ,पप्पू तेली, अंबालाल सुखवाल, रफिक गोलंदाज, देवीलाल आहेर, सागर बोराडे ,प्रशांत मारणे, नितीन भराटे, मनोज गुप्ता, सहदेव होनमाने,सोगिलाल पाटील आदीसह पुणे जिल्ह्यातील विक्रेते उपस्थित होते.
जगद्गुरु संत तुकाराम महाराज व ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्यातून लाखो भाविक या दोन्ही पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होत असतात. आळंदी व देहू च्या दिशेने जाणारे व पालखी मार्गातून परत येणारे भाविकांची गर्दी अनुचित प्रकार, चेंगराचेंगरी असे प्रकार होऊ नये म्हणून सुमारे पंधरा वर्षापासून महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे बंद ठेवून वारकऱ्यांची सेवा करण्यात येत आहे. मात्र कोणी दमदाटी केली तर सहन केली जाणार नाही. यामध्ये अनेक फेरीवाले हे वारकऱ्यांची विविध रूपाने सेवा करत असतात यामध्ये मोफत चहा, नाश्ता देणे, चरण सेवा ,अल्पोपहार सेवा अशा विविध प्रकारच्या सेवा फेरीवाल्याकडुन करण्यात येत आहेत. या बंदला फेरीवाल्यांनी पूर्वी पेक्षा अधिक सकारात्मक प्रतिसाद दिला असून हा उपक्रम वर्षानुवर्षे यशस्वीतेकडे जात आहे. बैठकीचे प्रास्ताविक सुशेन खरात यांनी केले तर आभार हरी भोई यांनी मानले.
पोलिसानीं कायदा-सुव्यवस्थेचा काम चोखपणे करावे
कोरोनाच्या भयानक दोन वर्ष या परिस्थितीमधून जात असताना अनेकांची उसनवारी झालेली आहे, कर्ज काढलेले आहेत. अशा स्थितीमध्ये १७ ते २२ तारखेपर्यंत फेरीवाल्यांना व्यवसाय करू द्यायचे नाही असा अजब आणि गजब आदेश पोलीस प्रशासन यांनी काढलेला आहे. हे अत्यंत चुकीचे असून पोलीस प्रशासन दबाव व विक्रेत्यावर दादागिरी करण्याचा प्रयत्न करीत आहे ते अत्यंत चुकीचे असून फेरीवाला संघटनेला विश्वासात घेऊन चांगल्या पद्धतीने नियोजन करू शकतो. आम्ही पंधरा वर्षापासून दोन दिवस पालखी च्या आधीचा दिवस आणि पालखी च्या दिवशी सहकार्य करीत आहोत. मात्र पाच दिवस जर व्यवसाय बंद ठेवणार असाल तर त्यांचे आर्थिक नुकसान पोलीस व मनपा प्रशासनाने द्यावे .