‘हे सरकार तात्पुरते, गुजरातबरोबर मध्यावधी लागणार’ ! संजय राऊतांच्या विधानाने खळबळ
मुंबई : खासदार संजय राऊत यांनी नव्या सरकारवर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला आहे. हे सरकार तात्पुरते असून गुजरातच्या विधानसभा निवडणुकीसोबत महाराष्ट्रातही निवडणुका लागतील, अशी भविष्यवानी संजय राऊतांनी केली आहे. त्यांच्या या विधानानं राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर विश्वासदर्शक ठराव बहुमताने जिंकला. त्यावर शिवसेनेत वातावरण तापल्याचे दिसते. जोपर्यंत मुंबई, महाराष्ट्रात शिवसेना मजबूत आहे. तोपर्यंत दिल्लीकरांचे इरादे सफल होणार नाहीत. महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याचा भाजपाचा डाव आहे. त्यांना मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करायची आहे, हे मी पूर्ण जबाबदारीने सांगतो. तसेच, सध्या महाराष्ट्रात असलेली व्यवस्था ही तात्पुरती आहे. ती फार काळ टिकणार नाही. भाजपाला शिवसेना फोडायची होती. त्यांनी ती फोडून दाखवली, असा आरोपही संजय राऊत यांनी केला.
गुजरातच्या निवडणुकांसह महाराष्ट्रातही मध्यावती निवडणुका लागण्याची शक्यता आहे. म्हणून ही तात्पुरती व्यवस्था भाजपने केली आहे. आम्ही सुद्धा तयारीला लागलो आहोत. कायदेशीर लढाई त्या दृष्टीने सुरू राहील, असे संजय राऊत म्हणाले. तसेच, आपण फुटलेला आहात, आपण बाहेर गेलो आहोत, हा प्रश्न आपल्या मनाला विचारा. शिवसेना हा मूळ पक्ष आहे आणि तो राहील. १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत याचिका प्रलंबित असताना विधानसभा अध्यक्ष निवडणूक घेणे घटनाबाह्य आहे. ते पात्र की अपात्र हे सर्वोच्च न्यायालय घेईल. त्यानंतर हा निर्णय घ्यायला हवा होता. स्वार्थासाठी गुडघे टेकू नका, अशी शिकवण आम्हाला बाळासाहेब ठाकरेंनी दिली आहे, असेही राऊत म्हणाले.
दरम्यान, कोणताही गट शिवसेनेला ताब्यात घेऊ शकत नाही. ताब्यात घ्यायला शिवसेना म्हणजे युक्रेन नाही. आज विधिमंडळात शिवसेना कमजोर झाली असेल. पण महाराष्ट्रात, ग्रामीण भागात शहरा शहरात शिवसेना तीच आहे. काही लोक सोडून गेले म्हणजे शिवसेना कमजोर झाली असे म्हणणे हा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांचा अपमान आहे. राज्यातील जनता बाळासाहेबांचा अपमान कधीही सहन करणार नाही, असा इशारा संजय राऊत यांनी बंडखोरांना दिला आहे.