नगरपरिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुका रद्द, गुडघ्याला बाशिंग बांधुन बसलेल्यांचा हिरमोड
मुंबई – राज्य निवडणूक आयोगाने एका महत्त्वाच्या कारणासाठी नगरपरिषद आणि नगर पंचायतीचा निवडणूक कार्यक्रम रद्द केला आहे. लागू करण्यात आलेली आचारसंहिता उठवण्यात आली आहे. त्यामुळे गुडघ्याला बाशिंद बांधून तयार असलेल्या उमेदवारांचा हिरमोड झाला आहे.
राज्य निवडणूक आयोगाने ८ जुलै २०२२ रोजीच्या पत्रान्वये १७ जिल्ह्यातील ९२ नगरपरिषदा व ४ नगरपंचायतींच्या सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम दिला होता. सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका क्रमांक १९७५६ / २०२१ ची सुनावणी दि . १२ जुलै, २०२२ रोजी झाली. त्यावेळी शासनाने समर्पित आयोगाने नागरिकांच्या मागासप्रवर्गाबाबत दिलेला अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केला.
सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भातील पुढील सुनावणी दि . १९ / ०७ / २०२२ रोजी ठेवलेली आहे. सदर पार्श्वभूमीच्या अनुषंगाने राज्यातील ९२ नगरपरिषदा व ४ नगरपंचायतींमधील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम याद्वारे स्थगित करण्यात येत आहे. सदर निवडणूकांसाठी सुधारित निवडणूक कार्यक्रम यथावकाश देण्यात येईल, असे आदेशात म्हटले आहे.