संत तुकारामनगर : माजी महापौराच्या 30 वर्षाच्या राजकारणाला ब्रेक !
- पुढील पाच वर्षासाठी प्रभागातून पत्ता कट
- अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी स्थलांतर अटळ
पिंपरी – पिंपरी-चिंचवडमधील संत तुकारामनगर प्रभागातून गेली तीस वर्षे सक्रिय राजकारण करणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी महापौर योगेश बहल यांच्या राजकीय कार्यकिर्दीला अखेर ब्रेक लागला आहे. प्रभाग क्रमांक 17 (संत तुकारामनगर) मध्ये सर्वसाधारण पुरूष गटासाठी आरक्षण नसल्यामुळे पुढील पाच वर्षासाठी या प्रभागातून त्यांचा पत्ता कट झाला आहे. नेते अजित पवार यांचे विश्वासू मानले जाणारे बहल यांना राजकीय अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी संत तुकारामनगरमधून आपला राजकीय बाडबिस्तरा उचलावा लागणार आहे.
योगेश बहल यांनी पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात टिकून राहण्यासाठी अत्यंत तडजोडीचे राजकारण केले आहे. गेल्या 30 वर्षांमध्ये त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ताकाळात महत्वाच्या पदांवर काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे स्वतःची राजकीय प्रतिष्ठा वाढविण्यात ते एक पाऊल पुढेच राहिले आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि त्यांच्यात अत्यंत विश्वासाचे नाते असल्याचे बोलले जाते. त्यांच्या हजरजबाबीमुळे शहरातील भूमीपुत्र राजकीय मातब्बरांच्या राजकीय व सामाजिक प्रतिष्ठेवर अनेकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे त्यांना गाववाल्यांचा कायम अप्रत्यक्ष विरोधच झालेला आहे. तो पचवून त्यांनी आपले राजकीय अस्तित्व टिकवून ठेवण्यात यश मिळवले आहे.
परंतु, 2022 च्या होऊ घातलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक लढवण्यासाठी मात्र, त्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात आले आहे. त्यांनी प्रत्येकवेळी सोयीचा करून घेतलेल्या प्रभाग क्रमांक 17 मध्ये यावेळी सर्वसाधारण पुरूष गटासाठी आरक्षण सुटले नसल्यामुळे येथून निवडणूक लढवणे त्यांना शक्य नाही. या प्रभागासाठी एससी पुरूष ओबीसी महिला व सर्वसाधारण महिला असे आरक्षण जाहीर झाल्यामुळे त्यांना निवडणूक लढवता येणार नाही. जर निवडणूक लढवायचीच असेल तर त्यांना महिला उमेदवार द्यावा लागेल. नंतर त्यांना राजकारणातून अलिप्त राहूनच काम करावे लागले. त्यामुळे ते या प्रभागातून महिला उमेदवारही देणार नाहीत आणि स्वतःही लढवणार नाही, असे चित्र आहे.
बहल यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात
बहल यांना राजकीय अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी शेजारच्या प्रभाग क्रमांक 42 (कासारवाडी- फुगेवाडी) मध्ये स्थलांतर करावे लागणार आहे. या प्रभागासाठी ओबीसी पुरूष, सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण असे आरक्षण आहे. या प्रभागात सर्वसाधारण जागेवर त्यांना निवडणूक लढवता येऊ शकते. हाच एकमेव पर्याय त्यांच्यापुढे आहे. अन्यथा महिला उमेदवार देण्याशिवाय आता बहल यांच्यासमोर दुसरा पर्याय उरला नाही. त्यामुळे बहल यांचे राजकीय अस्तित्वच धोक्यात आले आहे. त्यांच्या भूमिकांमुळे इतरांसमोर अडचणी निर्माण होण्याऐवजी आता त्यांच्यापुढेच पेच निर्माण झाला आहे. राजकीय अस्तित्वासाठी स्थलांतर करण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे. यापैकी ते कोणती भूमिका घेतात, हे पहावे लागणार आहे.