यंदा रिक्षावाले सुसाट, पण माजी महापौराच्या रिक्षाला ब्रेक !
- राहूल जाधव यांच्या रिक्षाने बदलला प्रभागाचा मार्ग
- प्रभागाची तोडफोड केल्याने झाली राजकीय गच्छंती
पिंपरी – राज्यात यंदा रिक्षावाला असणा-यांना नेत्यांना सुगीचे दिवस आले आहेत. शिवसेनेतून बंडखोरी करत एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदी विराजमान झाले. ते पुर्वाश्रमी ठाण्यात रिक्षा चालक म्हणून काम करत होते. त्यामुळे रिक्षा चालक-मालकांना त्यांचा अभिमान वाटतो. त्याचप्रमाणे पिंपरीत एक रिक्षावाला महापालिकेचा महापाैर झाला. त्यांनी ही दोन टर्म नगरसेवक म्हणून पद भोगले. परंतू, त्यांच्या मूळ प्रभागाची तोडफोड केल्याने त्यांना हक्कांच्या मतदारावर पाणी सोडावे लागणार आहे. त्यांनी प्रभाग 12 मधून जोरदार तयारी सुरु केली होती. पण तेथून त्यांना संधी मिळणे कठीण आहे. मात्र, त्यांना क्रमांक 3 मधून ओबीसी पुरुष पदावर संधी मिळू शकते, त्याठिकाणाहून निवडणूक लढविल्यास कितपत यश मिळेल, हे पाहावे लागणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणूक सर्वसाधारण गटातील ११४ जागांपैकी ३७ ओबीसी आणि महिला, पुरुष जागांचे आरक्षण काढण्यात आले. त्यात माजी महापौर योगेश बहल, माजी महापौर राहुल जाधव, शिवसेना माजी गटनेते राहुल कलाटे, माजी नगरसेवक मयूर कलाटे, मनसेचे गटनेते सचिन चिखले यांच्यासह अनेक दिग्गजांना नगरसेवक पदापासून दूर रहावे लागणार आहे. त्यांना पर्यायी मार्ग शोधून दुसरा प्रभाग शोधावा लागणार आहे.
माजी महापौर राहूल जाधव यांनी जाधववाडी, चिखली येथील प्रभागातून दोन टर्म नगरसेवक म्हणून काम केले. एकवेळ मनसेतून तर आता भाजपमधून नगरसेवक झाले होते. त्यांना भाजपकडून महापाैर पदाची संधी मिळाली. परंतू, आताच्या प्रभाग रचना फेरबदलात त्यांच्या प्रभागाची तोडफोड झाली. हक्कांचा मतदार विभागला गेला. त्यांना दूस-या प्रभागातून निवडणूकीला सामोरे जावे लागेल. त्या प्रभागातील राजकीय गणिते बिघडली तर भविष्यात राजकीय वाटचालीचा प्रवास खडतर असणार आहे.
रिक्षावाल्या महापौराचा राजकीय प्रवास
भाजपमधून राहुल जाधव यांनी विजय मिळवला आणि ते शहराचे महापौर झाले. अनेक अडथळे पार करून, परिस्थितीशी संघर्ष जाधव या पदावर पोहोचले. चिखली गावच्या जाधववाडी परिसरात एका शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचं शिक्षण केवळ दहावीपर्यंतच झालंय. कुटुंबीयांना आर्थिक हातभार लागावा, यासाठी ते रिक्षा चालवत असत. १९९६ ते २००३ या काळात ते रिक्षाचालक म्हणून काम करायचे. त्यानंतर दोन वर्ष शेती केली. 2004 साली विवाहबंधनात अडकल्यावर राहुल जाधव एका कंपनीत रिक्षाचालक म्हणून नोकरी केली. असा खडतर प्रवास सुरु असतानाच २००६ पासून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. त्यांनी राज ठाकरे यांच्या मनसेच्या शाखेची स्थापना केली. तेथून राहूल जाधव यांची राजकारणात एन्ट्री झाली. 2012 मध्ये ते जाधववाडी, चिखलीतून मनसेचे पहिले नगरसेवक झाले. त्यानंतर २०१७ मध्ये भाजपकडून नगरसेवक होवून ते महापौरपदावर गेले.