स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्म्यांना काँग्रेसचे अभिवादन – डॉ. कैलास कदम

  • काँग्रेसच्या आझादी गौरव यात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंपरी – ब्रिटिशांच्या दिडशे वर्षांच्या जुलमी राजवट सत्याग्रह आणि अहिंसेच्या मार्गाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी लढा उभारला. या स्वातंत्र्य लढ्यात शहीद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, दाभाडे यांच्या बरोबरच चापेकर बंधूंचे योगदानही वंदनीय आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त या सर्व न्यात, अन्यात शहीद हुतात्म्यांना पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांच्या वतीने अभिवादन करण्यात येत आहे. तत्कालीन चळवळीत या शहरातील काटे, घारे, गुजर, लूनावत, ढवळे, दरेकर, धोका, कोठारी, मिरजकर, पंडित, लुंकड, तिकोने, आतार, बंब, भन्साळी अशा अनेक कुटुंबातील अनेक स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान आहे. त्यांचा उचित सन्मान शहर काँग्रेस करीत आहे. या ज्येष्ठांचे योगदान पुढील काळात सर्वांना प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरेल असे प्रतिपादन काँग्रेस शहर अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी केले.

अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डाॅ. कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली शहर काँग्रेसच्या वतीने पिंपरी, चिंचवड शहरात ७५ किमी ची आझादी गौरव पदयात्रा ९ ऑगस्ट क्रांतीदिनाच्या दिवशी दापोडी येथील शहीद भगतसिंग आणि हुतात्मा नारायण दाभाडे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून सुरू करण्यात आली होती. यानंतर १४ ऑगस्ट पर्यंत रोज सकाळी आणि संध्याकाळी हि एकूण ७५ किलोमिटरची पदयात्रा काढण्यात आली. याचा समारोप चापेकर चौकात १४ ऑगस्टच्या रात्री करण्यात आला. यावेळी ७५ स्वातंत्र्य सैनिकांच्या उपस्थितीत ७५ मशाली प्रज्वलित करण्यात आल्या आणि चिंचवड गाव परिसरातून चापेकर चौकापर्यंत पदयात्रा काढण्यात आली. ७५ स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यानंतर १५ ऑगस्टच्या मध्यरात्री डॉ. कैलास कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीता नंतर सर्व धर्मिय प्रार्थना करण्यात आली. या पदयात्रेत शहर काँग्रेसचे सर्व नगरसेवक, आजी माजी पदाधिकारी, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, इंटक, एनएसयुआय आणि सर्व विभाग व सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक सहभागी झाले होते.

यावेळी डॉ. कैलास कदम यांनी सांगितले की, भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, राष्ट्रीय काँग्रेसचे तात्कालिन पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह कश्मिर ते कन्याकुमारी पर्यंत हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई या विविध धर्मातील विविध जाती व पंथातील नागरिकांनी सहभाग घेतला होता. या स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात अज्ञात अशा सर्व शहिद योद्ध्यांना, या पदयात्रेत अभिवादन करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यात सर्व जाती धर्मातील नागरिकांनी सहभाग घेऊन राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडवले.

Share to