अधिकारी, कर्मचा-यांनी घेतली भावनिक ऐक्य व सामंजस्यासाठीची प्रतिज्ञा

पिंपरी – कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराचा अवलंब न करता, वैयक्तिक किंवा सामुहिक स्वरुपाचे सर्व मतभेद विचार विनिमय करुन तसेच संविधानिक मार्गाचा अवलंब करुन सोडविण्याची तसेच जात, वंश, धर्म, प्रदेश किंवा भाषा विषयक भेद न करता सर्व भारतीय जनतेचे भावनिक ऐक्य आणि सामंजस्यासाठी काम करण्याची प्रतिज्ञा सदभावना दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अधिकारी व कर्मचारी यांनी केली.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांच्या हस्ते माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तसेच सदभावना दिनानिमित्त शपथही यावेळी घेण्यात आली. माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी सदभावना दिवस प्रतिज्ञेचे वाचन केले. भारताचे दिवंगत माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांची जयंती २० ऑगस्ट रोजी असून सदर दिवस हा सदभावना दिन म्हणून पाळला जातो. तथापि, सदर दिवशी साप्ताहिक सुट्टी असल्यामुळे दि. १७ ऑगस्ट २०२२ च्या शासन निर्णयानुसार महापालिकेच्या वतीने आज जयंती साजरी करण्यात आली.

पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमास मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे, मुख्य सुरक्षा अधिकारी मेजर उदय जरांडे, ‘ह’ क्षेत्रीय अधिकारी विजयकुमार थोरात, कार्यकारी अभियंता प्रमोद ओंभासे, जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड, कर्मचारी महासंघाचे मनोज माछरे, बालाजी अय्यंगार यांच्यासह कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.

शासन निर्णयानुसार दि. २० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२२ या कालावधीमध्ये महापालिकेच्या वतीने सामाजिक ऐक्य पंधरवडा म्हणून साजरा करण्यात येणार आहे. राज्यातील विविध प्रदेशातील अनेक धर्मांच्या व अनेक भाषा बोलणाऱ्या लोकांमध्ये एकमेकांविषयी ऐक्याची भावना वृध्दिंगत व्हावी असा उद्देश आहे.

Share to