बाप्पांच्या निरोपासाठी विसर्जन घाटावर कृत्रिम हौद तयार करावेत – सुजाता पालांडे


– विसर्जन घाटावर पर्यावरणपूरक विसर्जनाला प्राधान्य हवे

– आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली मागणी

पिंपरी (प्रतिनिधी) – कोविड संक्रमणाच्या दोन वर्षानंतर गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. त्यामुळे गणेश भक्तांच्या आनंदाला पारावार उरला नाही. यंदा मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा होत असताना विसर्जन घाटांवर चोक व्यवस्था करण्याची गरज आहे. गणेश मंडळ किंवा घरगुती बाप्पांचे विसर्जन करण्यात येणा-या शहरातील वेगवेगळ्या घाटांवर, महापालिका उद्यान तसेच मैदानांवर कृत्रिम विसर्जन हौद बांधण्यात यावेत, अशी मागणी भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश प्रसिध्दी प्रमुख सौ. सुजाताताई पालांडे यांनी आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात सर्वत्र गणेशोत्सवाच्या तयारीची लगबग सुरू आहे. गणेश मंडळांनी मिरवणुकीसाठी ढोलताशा पथकांची जय्यत तयारी केली आहे. कोरोनाच्या दोन वर्षानंतर हा उत्सव साजरा करण्याची संधी मिळतेय. हा उत्सव साजरा होत असताना इकोफ्रेंडली गणेशोत्सव साजरा होणे गरजेचे आहे. कोणत्याही प्रकारचे प्रदुषण होणार नाही, याची खबरदारी घेण्याचे आपले काम आहे. तरी आपण शहरातील गणेश मंडळांना इकोफ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करावे. त्यामुळे पर्यावरणास पोषक अशी नियमावली तयार करून त्याची प्रशासनामार्फत अंमलबजावणी करावी. जेणेकरून उत्सवादरम्यान होणारे प्रदूषण रोखले जाईल, असेही सुजाताताई पालांडे यांनी म्हटले आहे.

शहराच्या काही भागात दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन केले जाते. तर, जुनी सांगवी, नवी सांगवी व पिंपळे गुरव भागात काही मंडळे सोडली तर बहुतांश मंडळांच्या गणरायांना सातव्या दिवशी निरोप दिला जातो. तर, शहरातील निगडी, भोसरी, कासारवाडी, काळेवाडी, पिंपरी, संत तुकारामनगर, नेहरूनगर, थेरगाव, चिंचवड, वाल्हेकरवाडी, वाकड, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, सांगवी, रावेत आदी भागात अकरा दिवसांच्या गणपतीला निरोप दिला जातो. तसेच, सर्रास घरातील गणपतीचे अकराव्या दिवशीच विसर्जन केले जाते. दरम्यान, शहराच्या प्रत्येक भागातील विसर्जन घाटांवर स्वतंत्र हौद बांधण्याची गरज आहे. जेणेकरून घरगुती व मंडळाच्या गणपतीला हौदातील पाण्यात बाप्पांचे विसर्जन करता येईल. यासह अनेक ठिकाणी महापालिका उद्यान आणि मैदाने आहेत. त्या ठिकाणी देखील असे कृत्रिम हौद निर्माण करणे गरजेचे आहे. त्यामुळे गणेश मंडळांची विसर्जनासाठी सोया होईल. त्यासाठी सर्व विसर्जन घाटावर, उद्याने आणि मैदानांवर कृत्रिम हौदांची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी सुजाताताई पालांडे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.

Share to