बेंगलोर-मुंबई महामार्गावर रावेतमध्ये वाहतुकीचा बट्ट्याबोळ

  • प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे नियमांचे उल्लंघन

पिंपरी, दि. 18 (प्रतिनिधी) – रावेत येथील बेंगलोर-मुंबई महामार्गावर ग्रामदैवत श्री धर्मनाथ महाराज उड्डाण पुलाखाली वाहतूक कोंडी होण्याचा नित्यक्रम असल्यामुळे रावेतमधून महामार्गावर आणि पुनावळेमधून रावेतकडे येणाऱ्या वाहतुकीचा खेळखंडोबा झाला आहे. महापालिका प्रशासन आणि वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षपणामुळे ही वाहतूक कोंडी फोडण्यात अपयश येत असून नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

रावेत गावातून महामार्गावर जाण्यासाठी भोंडवे मळ्यातून ग्रामदैवत श्री धर्मनाथ महाराज उड्डाण पुलाच्या खालून जावे लागते. तसेच, रावेत गावाकडे सुध्दा याच मार्गाने यावे लागते. त्यामुळे पुनावळ्यातून आणि मुंबईकडून सेवा रस्त्याने रावेतमध्ये येणा-या वाहनांना याच मार्गाने जावे लागते. दोन्ही बाजुंकडून येणा-या वाहनांमुळे पुलाखाली प्रचंड वाहतूक कोंडी होते. रावेतमधून महामार्गावर किंवा पुनावळेकडे जाणारी वाहने आणि मुंबईकडून किंवा पुनावळ्याकडून येणारी वाहने समोरासमोर येऊन याठिकाणी वाहतूक कोंडी होते. त्यामुळे वाहनचालकांबोरबरच पादचाऱ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.

त्यातच रावेत येथील भोंडवे मळ्यात भोंडवे लॉन्स, महामार्गाच्या पलीकडे समीर लॉन्स आणि त्यापुढे थोड्याच अंतरावर महामार्गाला लागून सेंटोसा रिसॉर्ट आहे. या तीनही ठिकाणी विवाह सोहळे साजरे केले जातात. विवाह सोहळ्याला जाण्यासाठी वऱ्हाडी मंडळींच्या गाड्या याच मार्गाने धावतात. लग्न सोहळा उरकताच पुन्हा त्यांची परतण्यासाठी घाई सुरू असते. त्यामुळे उड्डाण पुलाखाली वाहने एकमेकांसमोर येऊन प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होते. तब्बल एकेक तास वाहतूक पूर्ववत करण्यासाठी वेळ लागतो. याठिकाणी प्रशासकीय यंत्रणा कार्यान्वित नसल्यामुळे वाहनचालकांकडून नियम धाब्यावर बसवले जातात. या बेशिस्त वाहतुकीमुळे महत्वाच्या कामांसाठी जाणाऱ्या नागरिकांना कोंडीत तासनतास अडकून पडावे लागते.
——–

Share to