‘अच्छे दिन आनेवाले है’, म्हणून मोदी सरकारने जनतेला विश्वासानं फसवलं – अजित पवार

पुणे – “अच्छे दिन आनेवाले है, म्हणून लोकांनी मोदी सरकारला निवडून दिले. मात्र, करोनामुळे जनता त्रासली आहे. केंद्र सरकारने त्यात लक्ष देऊन इंधनाचे दर कंट्रोलमध्ये ठेवले पाहिजेत, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाढत्या महागाईवरून मोदी सरकारवर जोरदार टीका केली.

अजित पवार यांनी आज पुण्यात करोना आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. अजित पवार म्हणाले, “देशात प्रचंड महागाई वाढली आहे. गॅस डिझेल पेट्रोलचे भाव खूप वाढले आहेत. लोकांच्या नोकऱ्या गेल्या, रोजगार बुडाले, अनेकांचे उद्योग अडचणीत आले आहेत. त्यासाठी लोकांनी आंदोलनं केली. पण केंद्र सरकार दखल घेताना दिसत नाही. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला दहा महिने होत आले. पण चर्चा होताना दिसत नाही. आता तर लोकसभेचं अधिवेशनही संपलं आता पुढच्या वर्षी अधिवेशनातच हा मुद्दा उपस्थित करता येईल. सध्या केंद्र सरकारची असलेली भूमिका ही देशाच्या जनतेचं दुर्दैव आहे”, अशी टिका पवार यांनी केली.

“मास्क वापरणं बंद केलं तर खूप मोठ्या प्रमाणावर परिस्थिती बदलत आहे. पुण्यात जिथं जिथं कार्यक्रम, वाढदिवस झाले. तिथं संपूर्ण घरं करोना पॉझिटिव्ह आले आहेत. पुण्यात नव्यानं निर्बंध लादणार नाही, पण पुणेकरांनी निर्बंध लावण्याची वेळ सरकारवर आणू नये. मात्र, करोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत असेल तर आम्हाला कठोर भूमिका घ्यावी लागेल.” असेही अजित पवार म्हणाले.

Share to