परीक्षा संपली, दहावीच्या विद्यार्थ्यांचा जल्लोष!

पिंपरी, दि. 26 (प्रतिनिधी) – माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेली इयत्ता दहावीची परीक्षा शनिवारी (दि. 25) संपली. शेवटचा पेपर संपताच वर्गाबाहेर पडत विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. तसेच सुटीचे बेत आखण्यात अनेक विद्यार्थी गुंतल्याचे पहावयास मिळाले. परीक्षा संपल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता.

दहावीची परीक्षा ही अवघड समजली जाते. या परीक्षेत मिळालेल्या गुणांवर पुढील आयुष्याची दिशा ठरते. त्यामुळे या परीक्षेचा ताण विद्यार्थ्यांवर असतो. वर्षभर विद्यार्थी परीक्षेची तयारी करत असतात. दहावीची परीक्षा 2 मार्च रोजी सुरू झाली होती व शनिवारी (दि. 25) संपली. शेवटचा पेपर देऊन बाहेर आलेल्या विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष करत आनंद व्यक्त केला.

पिंपरी चिंचवड शहरातील 46 केंद्रांवर 33 हजार 587 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. परीक्षेचा शेवटचा पेपर दिल्यावर विद्यार्थ्यांनी आपल्या वर्ग मित्र मैत्रिणींसमवेत सेल्फी काढल्या. परीक्षा आणि पेपरविषयी चर्चा करत आपल्याला किती टक्के गुण मिळतील, पुढे कोणत्या विषयात करिअर करायचे याची चर्चाही काही विद्यार्थ्यांमध्ये रंगली होती. सुटीमध्ये विविध कोर्स आणि क्‍लास विषयी चर्चा सुरू होती.

Share to