पेन्शनसाठी कष्टकऱ्यांनी लढा बुलंद करावा – बाबा कांबळे

औंध येथे महाराष्ट्र रिक्षा पंचायतच्या शाखेचे उदघाटन
पिंपरी, दि. 26 (प्रतिनिधी) – गोरगरीब, कष्टकरी, रिक्षा चालक, फेरीवाले, सफाई कामगार, धुणी भांडी काम करणाऱ्या महिला, बांधकाम मजुरांसह देशात 45 कोटी असंघटित कामगार कष्टकरी जनता आहे. हातावरचे पोट असणाऱ्या या कष्टकऱ्यांची आर्थिक कुचंबणा होत आहे. त्यांना खरा पेन्शनचा आधार सरकारने सुरु करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी केले.

आमदार, खासदारांना जर पेन्शन मिळत असेल तर कष्टकरी रिक्षा चालकांना का नाही, असा प्रश्‍न बाबा कांबळे यांनी उपस्थित करत कष्टकऱ्यांच्या पेन्शनसाठी लढा बुलंद करण्याचे आवाहन त्यांनी कष्टकऱ्यांना केले. औंध येथील हॉस्पिटल समोर महाराष्ट्र रिक्षा पंचायतीच्या शाखेचे उद्‌घाटन महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे संस्थापक अध्यक्ष बाबा कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

बाबा कांबळे म्हणाले की, सध्या महाराष्ट्रात आणि देशात सरकारी कर्मचाऱ्यांचा पेन्शनचा मुद्दा गाजत आहे. सरकारने पेन्शन देण्याचे आश्वासन देखील दिले आहे. या उलट वयाच्या साठीनंतर कष्टकरी वर्गाला कोणत्याही प्रकारच्या सुविधा मिळत नाहीत. त्या वयातही त्यांना कष्ट करण्याची वेळ येते. या पार्श्वभूमीवर कामगार कष्टकरी जनतेला पेन्शन मिळाली पाहिजे.

Share to