इस्लामपूर एसटी आगार दिवसाकाठी अडीच लाखाच्या तोट्यात

  • दोन वर्षात एसटी फेऱ्या आणि प्रवासी संख्या घटल्याचा परिणाम

प्रदीप लोखंडे : सांगली

खेड्यापाड्याला जोडत गरिबांचा प्रवास सुखकर करणारी लाल परी (एसटी) सध्या आर्थिक डबघाईला आली आहे. सगळं सुरळीत चालू असताना कोरोना महामारीची वक्रदृष्टी पडली आणि एसटीला आर्थिक फटका बसू लागला. एसटीची पुरेशी व्यवस्था नाही. त्यामुळे बस फेऱ्या कमी झाल्या. त्याबरोबरच प्रवासी संख्या घटली. या सगळ्याचा परिणाम म्हणून सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर एसटी आगाराला पूर्वीपेक्षा सध्या दिवसाकाठी अडीच लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. तर दुसरीकडे फेऱ्या घटल्याने प्रवाशांच्या गैरसोयीत देखील भर पडताना दिसत आहे.

कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर तर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. इस्लामपूर एसटी आगार देखील सध्या आर्थिक फटका सहन करत आहे. आगारातील एसटी बसची संख्या कमी करण्यात आली आहे. सध्या आगारात केवळ 68 एसटी बस उपलब्ध आहेत. त्या बस विविध मार्गावर धावत आहेत. ही संख्या अपुरी असल्याने अनेक गावातील बस फेऱ्या कमी करण्याची नामुष्की आगारावर ओढावली आहे. आगाराला आणखी 15 एसटी बसची आवश्यकता आहे. तरच सर्व गावातील बस फेऱ्या पूर्वीप्रमाणे सुरु होतील. लॉकडाऊन होण्यापूर्वी म्हणजे २०१९ मध्ये आगाराच्या सर्व मार्गावर ७५० फेऱ्या व्हायच्या. त्यामध्ये घट झाली असून आता केवळ 470 फेऱ्या होत आहेत. २०१९ मध्ये आगाराला दिवसाला ९ लाख रुपये उत्पन्न भेटत होते. त्यामध्ये अडीच लाख रुपयांची घट झाली असून सध्या केवळ साडे सहा लाख रुपयांवरच समाधान मानावे लागत आहे. पूर्वी दिवसाला २४ हजार प्रवासी प्रवास करत होते. सध्या केवळ १८ ते 20 हजार प्रवाशांची नोंद होत आहे.

याबाबत बोलताना इस्लामपूर बस स्थानकाचे आगारप्रमुख डी. एम. ठोंबरे म्हणाले की, सध्या एसटीच्या फेऱ्या घटलेल्या आहेत. त्याचा परिणाम म्हणून उत्पन्न कमी झाले आहे. आम्ही आमच्या वरिष्ठांकडे जादा बस देण्याबाबत पत्र दिले आहे. लवकरच नवीन बस ताफ्यात दाखल होतील.

वरील परिस्थिती पाहता शासनाने या बाबत अधिक चांगल्या उपाययोजना आणणे गरजेचे आहे. मात्र राज्य शासन सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्याबाबत उदासीन दिसत आहे. वारंवार पत्रव्यवहार करूनही राज्य शासन जादा एसटीची कुमक आगाराला देत नाही. परिणामी फेऱ्या कमी झाल्याने उत्पन्नात घट होत आहे. नंतर परवडत नसल्याचे कारण सांगून सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे खाजगीकरण करण्याचा डाव राज्य शासनाचा आहे की काय, असा प्रश्न उभा राहत आहे. इस्लामपूर एसटी आगाराच्या फेऱ्या कमी झाल्याने त्याचा परिणाम नोकरदार, विद्यार्थी, सर्वसामान्य गोरगरिबांवर होत आहे. वेळेत एसटी नसल्याने कामावर जाण्याची चिंता नोकरदारांना सतावत आहे. तर एसटी अभावी दीड दोन किलोमीटर पायपीट करण्याची वेळ विद्यार्थ्यांवर येत आहे. हे थांबवायचे असेल तर राज्य शासनाने गरिबांना परवडणारी एसटी वाचविणे गरजेचे आहे. त्यासाठी जनतेमधूनही लढा उभा राहून सरकारवर दबाव निर्माण करणे गरजेचे आहे.

  • प्रदीप लोखंडे, संपादक, महाईन्युज.
  • मो. नं – ७३५०२६६९६७
Share to