राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला

पुणे – पुढीलवर्षी सन २०२२ च्या फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी मतदारसंघ रचनेचा प्रारूप आराखडा तयार करण्याबाबतचे आदेश शुक्रवारी (दि. १९) सायंकाळी राज्य निवडणूक आयोगाने जारी केले. येत्या ३० नोव्हेंबर अखेर हे काम पूर्ण करावे, असे आदेश राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. या आदेशाच्या निमित्ताने राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजले आहे.

राज्यातील मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम, भंडारा, गोंदिया आणि नागपूर हे जिल्हे वगळता अन्य सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक होणार आहे. नगर जिल्ह्यात ७५ जिल्हा परिषद गट आणि १५० पंचायत समिती गणासाठी फेब्रुवारीत रणांगण रंगणार आहे. या निवडणुकीची तयारी सर्वच पक्षांकडून गेल्या सहा महिन्यांपासून जोरदारपणे सुरू असून, विविध पक्षांतील मातब्बरांना आपल्या पक्षात आणण्याची रस्सीखेच सुरू आहे.

२०११ च्या जनगणनेच्या आधारे रचना करायची असल्यामुळे चालू मतदारसंघ संख्येमध्ये बदल होण्याची शक्यता कमी आहे. राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त अविनाश सणस यांनी काढलेल्या आदेशात ३० नोव्हेंबरपूर्वी प्रभागरचना तयार करण्यात यावी, असे म्हटले आहे. प्रभागरचना आणि आरक्षण सोडतीची कार्यवाही करण्यासाठी लागणारा कालावधी लक्षात घेता निवडणुका या मुदत समाप्तीपूर्वी पार पडणे आवश्यक आहे, असेही त्यांनी आदेशात म्हटले आहे.

Share to