‘समीर दाऊद वानखेडे यांचे हे फर्जीवाडा केंद्र आहे,’ रेस्टॉरंटचा फोटो शेअर करत मलिकांचा आरोप

मुंबई – अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर आरोप केला आहे. वानखेडे हे मुंबईमधील एका बार आणि रेस्टॉरंटचे मालक असल्याचा धक्कादायक खुलासा मलिक यांनी केला आहे. मलिक यांनी रेस्टॉरंटचा फोटो ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे.

“समीर दाऊद वानखेडे यांचे हे फर्जीवाडा केंद्र आहे,” अशा कॅप्शनसहीत नवाब मलिक यांनी हा फोटो शेअर केला. आज मलिक पत्रकार परिषद घेणार असून त्यामध्ये ते याच बाबतीत अधिक खुलासे करणार असल्याची शक्यता शक्यता आहे. टीओआयच्या वृत्तानुसार समीर वानखेडे यांच्या नावे बार आणि रेस्टॉरंटचा परवाना आहे. नवी मुंबईमधील वाशी येथे हा बार आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या अहवालानुसार वाशीमधील सद्गुरु हॉटेलचा परवाना वानखेडे यांच्या नावे आहेत. हा परवाना २७ ऑक्टोबर १९९७ रोजी जारी करण्यात आला आहे. तसेच, हा परवाना रिन्यू करण्यात आला असून सध्या तो ३१ मार्च २०२२ पर्यंत पात्र आहे. या बारमध्ये परदेशी तसेच भारतीय बनावटीच्या दारुची विक्री करण्यास परवानगी देण्यात आली.

गुरुवारीच मलिक यांनी वानखेडेंच्या शाळा दाखल्यावर ते ‘मुस्लीम’ असल्याची नोंद असल्याचा दावा केलाय. वानखेडे यांनी अनुसूचित जाती प्रवर्गाच्या खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारावर सरकारी नोकरी मिळविल्याच्या आरोपाचं समर्थन करण्यासाठी मलिक यांनी वानखेडे यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यांवर मुस्लीम अशी नोंद असल्याची माहिती दिली. वानखेडे यांनी मुंबई पालिकेच्या दस्तऐवजांमध्ये खाडाखोड केल्याचा आरोपही त्यांनी केला.

वानखेडे भारतीय महसूल सेवेतील (आयआरएस) अधिकारी आहेत. ते मुस्लीमधर्मीय असताना त्यांनी अनुसूचित जातीचे खोटे प्रमाणपत्र घेऊन सरकारी नोकरी मिळविल्याचा आरोप मलिक यांनी यापूर्वीच केला आहे. त्याच्या पुष्टय़र्थ त्यांनी गुरुवारी काही दस्तऐवज उघड केले. त्यात वानखेडे यांच्या शाळा सोडल्याच्या दोन दाखल्यांचा समावेश आहे. दोन्ही दाखल्यांवर ‘समीर दाऊद वानखेडे’ असे नाव असून, धर्माच्या रकान्यापुढे मुस्लीम अशी नोंद आहे.

 दरम्यान नवाब मलिक यांनी काल गुरुवारी 18 नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषद घेऊन आपण कशा पद्धतीने समीर वानखेडेंचा खरा जन्म दाखला मिळवला आणि वानखेडे कशाप्रकारे फसवणूक करुन अधिकारी झाले याबाबतया सगळ्या प्रकाराबाबत आता नेमका खुलासा केला आहे. तर, दुसरीकडे वानखेडेंच्या जात प्रमाणपत्राविरोधात स्क्रूटनी कमिटी दोन तक्रारी प्राप्त झाल्या आहे. ज्यातील एका तक्रारदाराचे नाव स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे मनोज संसारे आणि दुसऱ्या तक्रारदाराचे नाव भीम आर्मीचे अशोक कांबळे असे आहे.

या तक्रारीत समीर वानखेडे यांचे जात प्रमाणपत्र खोटे आहे. जे मिळण्यासाठी त्यांनी मूळ कागदपत्रांमध्ये छेडछाड केली आहे, जेणे करुन त्यांना एससी जातीमध्ये नोकरी मिळू शकेल, असे आरोप करण्यात आले आहे. या कमिटीमार्फत दोन्ही तक्रारदारांना ३० नोव्हेंबर रोजी सुनावणीसाठी कोर्टात हजर राहण्याचे आदेशही देण्यात आले.

या तक्रारीनंतर समीर वानखेडे यांना कमिटीसमोर हजर रहावं लागणार आहे. यानंतर समीर वानखेडेंचे सर्व कागदपत्रांची तपासणी प्रक्रिया सुरु होईल. तक्रारदारांकडून या कमिटीसमोर समीर वानखेडे यांचा जन्मदाखला, निकाहनामा हे पुरावे म्हणून सादर करण्यात आले आहे. या पुराव्यांच्या आधारे समीर वानखेडेंचे जात प्रमाणपत्र खोटं असल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे.

दरम्यान तीन महिन्यांच्या कालावधीत कमिटीला तपास करायचा असतो. या कालावधीत तपास न झाल्यास कमिटी वेळ मागून घेऊ शकते. दरम्यान तपासाअंती जात प्रमाणपत्र किंवा दस्तावेज खोटे असल्याचे आढळले तर अशावेळी जात प्रमाणपत्र रद्द करण्याचा अधिकारी कमिटीला आहेत.

Share to