इशारा देऊनही कामावर हजर न होणा-या कर्मचा-यांवर आता कारवाई – परिवहन मंत्री अनिल परब
मुंबई – काही कर्मचारी कामावर हजर झाले आहेत, तर काही एसटी कर्मचारी अजूनही संपावर आहेत. त्यामुळे हट्ट करून संपावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावीच लागेल असा इशारा त्या कर्मचाऱ्यांना परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडून देण्यात आलाय. गेल्या काही दिवसांपासून राज्यातले एसटी कर्मचारी राज्यव्यापी संपावर होते. हा संप १५ दिवस चालल्यानंतर राज्य सरकारनं ऐतिहासिक ४१ टक्के पगारवाढ जाहीर केली आणि संप मागे घेण्याचं आवाहन करण्यात आलं.
एसटी डबघाईला आली आहे, तिला खाईत लोटू नका असंही परिवहन मंत्री म्हणालेत. आम्ही गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत, गुणरत्न सदावर्ते या सर्वांशी चर्चा केली आहे, मात्र सदावर्ते विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. त्यांनी कोर्टात लढावं, आमचं काही म्हणणं नाही असंही परब म्हणालेत. न्यायालयीन प्रक्रियेचा वेळ सदावर्ते कमी करु शकतात का? असा सवालही परबांनी केलाय. एसटी कर्मचाऱ्यांनी हट्ट न करता कामावर हजर व्हावं असं आवाहन अनिल परबांनी केलंय. त्यामुळे आता परबांच्या आवाहनाला एसटी कर्मचारी किती प्रतिसाद देतात? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
१२ तासांच्या अल्टिमेटमनंतर जे कामगार येत आहेत किंवा नाही यांची यादी तयार केली जात आहे, त्यानंतर स्वरुप ठरवले जाईल. यासाठी अनेक पर्यायांवर चर्चा सुरु आहे. राज्य शासन म्हणून आम्ही प्रत्येक गोष्टींची तयारी करु ठेवली आहे, असेही परब म्हणाले.