अण्णा भाऊ साठे महामंडळाला वाढीव १२०० कोटी भागभांडवल द्यावे, अन्यथा आंदोलन

  • माजी अध्यक्ष तथा भाजपा प्रदेश सचिव अमित गोरखे यांचे सरकारला पत्र

पिंपरी (प्रतिनिधी) – साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे विकास महामंडळास भागभांडवल अत्यंत तुटपूंजे असून तसेच अनेक दिवस महामंडळ बंद अवस्थेत आहे. त्यामुळे मागील अनेक वर्षांचे भागभांडवल वायाच गेले आहे. या अनुषंगाने १२०० कोटी भागभांडवल त्वरित महामंडळाला देऊन ते ताबडतोब चालू करावे. अशी मागणी महामंडळाचे माजी अध्यक्ष तथा भाजपा प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी केली आहे.

राज्य सरकारकडून मिळणाऱ्या भागभांडवला मधून 1 लाख ते ५ लाख रुपयेपर्यंतची थेट कर्ज योजना तात्काळ सुरू करावी. बीजभांडवल कर्ज योजनेची मर्यादा 7 लाख रुपये वरून 10 पर्यंत करण्यात यावी, त्यामध्ये महामंडळाचा हिस्सा 20 % ऐवजी 45 % इतका व बँक कर्ज 50 % तसेच लाभार्थी हिस्सा 5 % असा करून तात्काळ शासन निर्णय काढून योजना पूर्ववत करावी. अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या धर्तीवर 10 लाख रुपये पर्यंतची व्याज परतावा योजना या महामंडळास तात्काळ सुरू करावी. अन्यथा महाराष्ट्र भर समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा गोरखे यांनी दिला आहे.  

पहिल्या अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषणा केलेले १०० कोटी रुपये अजूनही मंडळाला प्राप्त झाले नाहीत, याचीही आठवण त्यांनी करून दिली आहे.

Share to