भाजपा पदाधिका-यांनी मेलेल्याच्या टाळुवरचं लोणी खाण्याचा उद्योग बंद करावा – शिवसेना संघटक संतोष सौंदणकर

  • स्वतःचे पाप झाकण्यासाठी भाजपाकडून गजानन चिंचवडे यांच्या मृत्युचे राजकारण
  • भाजपाचे राज्यसभेवरील माजी खासदार अमर साबळे यांचे आरोप बिनबुडाचे

पिंपरी (प्रतिनिधी) – तब्बल 29 वर्षांपूर्वी जमीन खरेदी विक्री व्यवहार चिंचवडे यांच्या परिवारात झालेला आहे. स्व. गजानन चिंचवडे यांच्यावर गुन्हा दाखल करायचाच झाला असता तर एवढा उशीर कशाला लावला असता. स्व. गजानन चिंचवडे हे शिवसेनेचे कट्टर जिल्हाप्रमुख होते. त्यांच्या कामाची दखल घेऊन पक्षप्रमुख उध्दव ठाकरे साहेबांनी त्यांचे कौतुकच केले आहे. त्यांच्यावर मानसिक तणाव वाढवून त्यांना अडचणीत आणण्याचा उद्योग शिवसेना कदापी करणार नाही. त्यामुळे कोणाच्यातरी आशिर्वादाने राज्यसभेची लॉट्री लागलेल्या माजी खासदार अमर साबळे यांनी मेलेल्याच्या टाळुवरचं लोणी खाण्याचा उद्योग केला आहे. स्वतःचे पाप झाकण्यासाठी त्यांच्या मृत्युचे राजकारण करून महाविकास आघाडी सरकारची बदनामी करणे बंद करा, अशा शब्दांत शिवसेना शहर संघटक संतोष सौंदणकर यांनी साबळेंना इशारा दिला.

पिंपरी-चिंचवडमधील शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांचे शनिवारी (दि. 5) दुपारी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. यानंतर सायंकाळी भाजपाचे माजी खासदार अमर साबळे, महापौर माई ढोरे, पक्षनेते नामदेव ढाके व भाजपाच्या इतर नेत्यांनी पत्रकार परिषद घेत चिंचवडे यांच्या मृत्यूस महाविकास आघाडी सरकार जबाबदार असल्याचा आरोप केला. त्याला शिवसेनेचे शहर संघटक सौंदणकर यांनी परखड शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे.

संतोष सौंदणकर यांनी म्हटले आहे की, स्व. गजानन चिंचवडे यांच्यावर शिवसेनेची मोठी जबाबदारी होती. जिल्हा प्रमुख म्हणून त्यांनी मावळ मतदार संघात शिवसेनेचे उत्तम कार्य केले आहे. शिवसेनेला त्यांच्या कार्याचा कदापी विसर पडणार नाही. शिवसेनेने त्यांना भरपूर दिले असताना त्यांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला. कोणी कुठे जायचं, कुठे थांबायचं हा प्रत्येक व्यक्तीचा वैयक्तीक अधिकार असतो. त्यानुसार त्यांनी निर्णय घेतला असेल. त्याबद्दल शिवसेनेने नाराजी व्यक्त केलेली नाही. कारण, शिवसेनेचं त्यांच्या जाण्यानंतर कोणत्याही प्रकारचं नुकसान झालेलं नाही. उलट भाजपाने त्यांना कोणत्या अटी शर्ती घालून पक्षात सामावून घेतलं, त्याची चौकशी झाली पाहिजे. स्वर्गवासी झालेल्या व्यक्तीचे कितपत राजकारण करायचे हे लक्षात न येणे म्हणजे भाजपाचे दुर्दैवच म्हणावे लागेल.

स्व. गजानन चिंचवडे यांच्यावर महाविकास आघाडी सरकारचा कोणत्याही प्रकारचा दबाव नव्हता. त्यांच्यावर जो गुन्हा दाखल झाला तो जमिनीच्या वादातून झालेला आहे. काही वर्षांपूर्वी चिंचवडे कुटुंबियांमध्ये जमीन खरेदी-विक्रीचा व्यवहार झाला होता. त्यातून त्यांच्यात वाद होऊन ते प्रकरण पोलिसांत गेले. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. त्याचा गैरअर्थ काढून भाजपाचे माजी खासदार अमर साबळे यांनी महाविकास आघाडी सरकारवर केलेला आरोप तथ्यहीन आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर बिनबुडाचे आरोप करून भाजपा नागरिकांची दिशाभूल करीत आहे. एखादा व्यक्ती स्वर्गवासी झाल्यानंतर एवढ्या खालच्या पातळीचे राजकारण आजपर्यंत कोणत्याही पक्षाने केले नव्हते. मात्र, मेलेल्याच्या टाळुवरचं लोणी खाणा-या भाजपाने तसा प्रयत्न शहरात केला आहे. या मुद्याचे राजकारण करण्याऐवजी त्यांच्या कुटुंबियांसोबत दुःखात सहभागी होऊन त्यांना पाठींबा देण्याचे शहानपण भाजपाला का सूचत नाही. उगाच फालतू राजकारण करून महाविकास आघाडी सरकारची बदनामी करणे थांबवा. अन्यथा भाजपाला हे महागात पडेल, असाही इशारा शहर संघटक सौंदणकर यांनी दिला आहे.

Share to