संकुचित वृत्ती, व्यक्तीनिष्ठा आणि जातीय अस्मितांना महत्व दिल्याने सामाजिक एकोप्याला बाधा
- शिवजयंतीनिमित्त आयोजित चर्चासत्रात मान्यवरांचा सूर
पिंपरी (प्रतिनिधी) – छत्रपती शिवरायांच्या काळातील सर्व समावेशक भूमिका घेणा-या बहुजनांनी सद्यस्थितीत संकुचित वृत्ती, व्यक्तीनिष्ठा आणि जातीय अस्मितांना महत्व दिल्याने सामाजिक एकोप्याला बाधा निर्माण झाली आहे, असा सूर “छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यातील बहुजनांची भूमिका आणि सद्यस्थिती” या विषयावर आयोजित चर्चासत्रात निघाला.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन पिंपरी येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात करण्यात आले आहे. यामध्ये सामाजिक नेते राजेंद्र कोंढरे, प्रसिध्द विचारवंत प्रा. डॉ. सुरेश शेळके, प्रा.डॉ. शमशुद्दीन तांबोळी आणि भारतीय संविधान अभ्यासक शशिकांत औरंगाबादकर सहभागी यांचा सहभाग असलेल्या चर्चासत्राचा कार्यकम संपन्न झाला, त्यावेळी सहभागी वक्त्यांनी विविध मुद्द्यांना स्पर्श करत विषयाची मांडणी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मारुती भापकर यांनी केले.
राजेंद्र कोंढरे म्हणाले, छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्मितीसाठी सर्व जात समूहाला एकत्र केले. स्वराज्य रक्षणासाठी, स्त्री रक्षणासाठी आणि अन्याय अत्त्याचारा विरुद्ध तलवार हातात घेतली. शत्रूवर मात करत शौर्य गाजवले. परंतू सध्या तरुणाई हातात तलवार घेऊन वाढदिवसाचे केक कापण्यात शौर्य समजते हि शोकांतिका आहे. शिवाजी महाराजांच्या काळात जात-धर्म पाहून नाही तर माणसाचे कार्य कर्तुत्व पाहून काम दिले जायचे. आजची लोकशाही छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन प्रस्तापित करण्यात आली आहे.
जयंती-उत्सव करताना शिवाजी महाराजांना समजून घेत नसल्यामुळेच आज लोकांना छत्रपती शिवाजी महराज समजवून सांगायची वेळ आली आहे. छत्रपती शिवाजी महराजांच्या पुतळ्या॑मधून त्यांचे शौर्य दिसते पण त्यांचे व्यवस्थापन शास्त्र, पर्यावरणपूरक धोरण, समाजशास्त्र, प्रयोगशील नेतृत्व दिसून येत नाहीत. तरुणांना छत्रपती शिवाजी महाराज समजावून सांगितल्याशिवाय तलवार कोणावर चालवायची हे त्यांना समजणार नाही.
प्रा.डॉ. शमशुद्दीन तांबोळी म्हणाले, भारतातल्या इतर कोणत्याही व्यक्तीमत्वाची घेतली नसेल एवढी दखल छत्रपती शिवाजी महाराजांची घेतलेली आहे. आज आपण जी धर्मानिपेक्षता पाहतो ती छत्रपती शिवाजी महाराजांनी ३०० वर्षांपूर्वीच मांडली होती आणि ती अंमलात देखील आणली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील जनता स्वतःच्या धर्मापेक्षा महाराजांवर निष्ठा बाळगणारी होती. छत्रपती शिवाजी महाराजांची सर्व समावेशक राज्य प्रणाली आजच्या काळात आत्मसात करणे आवश्यक आहे. शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या संकल्पनेतून देशाला दिशा मिळण्याचे काम होऊ शकते. महाराजा॑बद्दल फक्त गौरवोदगार काढून चालणार नाही, तर त्यांचे विचार आत्मसात करणे देखील महत्वाचे आहे.
प्रा. डॉ. सुरेश शेळके म्हणाले, देशामध्ये अनेक राजे होऊन गेले पण जनतेला आपलेसे वाटतील असे एकच राजे होते ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. राजा प्रजेचा आधार असतो हि भावना छत्रपती शिवाजी महाराजांची होती म्हणून त्यांना रयतेचा राजा म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराज इतिहासात गेले असले तरी त्यांचे विचार इतिहासात जाऊ शकत नाहीत. जो समाज इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही. शिवाजी महराजांवर फक्त संत तुकाराम महराजांच्या विचारांचाच पगडा नव्हता तर सुफी संतांच्या विचारांचाही पगडा होता. शिवाजी महराजांनी फक्त क्षत्रियांना नाहीतर समाजातील प्रत्येक घटकाला सैन्यात सामावून घेतले. छत्रपती शिवाजी महाराज कोणत्याही धर्माच्या विरोधात नव्हते. महाराजांना फक्त त्यांनी केलेल्या लढायांसाठी लक्षात ठेवू नये तर त्यांचे विचार आणि सामाजिक भान देखील लक्षात घेणे आवश्यक आहे, असेही डॉ. शेळके म्हणाले.
शशिकांत औरंगाबादकर म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये जो न्याय निवडा होत होता तो न्याय निवडा आजच्या लोकशाहीमध्ये होताना दिसत नाही. म्हणूनच स्त्रियांवरील अत्याचारात वाढ होत असल्याचे दिसून येते. समाजातील प्रत्येक घटक छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यामध्ये सामील होता. प्रत्येक जाती धर्मातील संतांनी शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव केला आहे. पण आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांनाच जाती-धर्माच्या बंधनांमध्ये बांधून ठेवलंय, त्यांना या जाती-धर्माच्या बंधनातून मोकळं करणे आवश्यक असल्याचे मतही औरंगाबादकर यांनी मांडले.
या चर्चा सत्रानंतर ख्यातनाम शाहिर संभाजी भगत यांच्या शाहिरी जलश्याचा कार्यक्रम सादर झाला. यामध्ये त्यांनी छत्रपती शिवरायांच्या समाजशील कृतीवर आधारित असलेल्या विविध घटनांवर आधारित गीते आणि पोवाडे सादर केले. याप्रसंगी सहाय्यक आयुक्त वामन नेमाणे, जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड, जनसंपर्कचे प्रफुल पुराणिक तसेच शिवजयंती उत्सव समितीचे जीवन बोराडे , सागर तापकीर, अभिषेक म्हसे, दत्तात्रय शिंदे, दादा पाटील, सतीश काळे, नकुल भोईर, धनंजय येळवंडे ,प्रकाश जाधव, संतोष जोगदंड, विशाल जाधव, निखील गनुचे, महेश गवस, शशिकुमार टोपे आदी उपस्थित होते.