पुण्यातून आसामला विमानातून पाठवली 63 दुर्मीळ कासवं

पिंपरी – राज्यात पहिल्यांदाच ६३ दुर्मिळ प्रजातीचे कासवे पुण्यातून हवाई मार्गाने आसामला त्यांच्या मूळ अधिवासात पाठविण्यात आले आहेत. पुणे वनविभागाच्या वतीने हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला आहे.

कात्रज येथील हर्पेटोलॉजीकल सोसायटी यांचाकडे असलेले ५५ आणि बावधानच्या रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट यांच्याकडे असलेल्या ८ दुर्मिळ कासवांना आसाम मधील गुवाहाटीत सोडण्यात आले. अशी माहिती पुणे वन विभागातर्फे गुरुवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी सामाजिक वनीकरण विभागाचे अप्पर प्रधान मुख्य वनंसरक्षक विवेक खांडेकर, पुणे वन विभागाचे मुख्य वनसंरक्षक सुजय दोडल, उपवनसंरक्षक राहुल पाटील आदी उपस्थित होते.

खांडेकर म्हणाले, ‘‘तस्करी किंवा बेकायदेशीर पद्धतीने घरात ठेवण्यात आलेल्या कासवांना वन विभागाद्वारे वाचविण्यात आले होते व त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून या संस्थांमध्ये ठेवण्यात आले होते. यामध्ये इंडियन रूफ टर्टल, क्राऊंड रिव्हर टर्टल, ब्राऊन रूफ टर्टल, स्पॉटेड रिव्हर टेरॅपीन सारख्या दुर्मिळ प्रजांतींचा समावेस आहे. त्यापैकी काही प्रजाती वन्यजीव संरक्षक कायदा १९७२ अंतर्गत अनुसूचि-१ मध्ये त्यांचा समावेश आहे.

या कासवांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात पाठविणे गरजेचे होते. याच अनुषंगाने कासवांची संपूर्ण वैद्यकीय प्रक्रिया पूर्ण करत सर्व कासवांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात पाठविण्याकरिता ‘गुवाहाटीतील टर्टल सर्व्हायवल अलायन्स’ आणि आसाम वन विभागातील कर्मचाऱ्यांशी समन्वय साधण्यात आले आहे. तर आसाम वनविभाग या प्रजातींना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्याची खात्री घेतील.’’

कासवा सारख्या दुर्मिळ होत चाललेल्या वन्यजीवाला हवाई मार्गे त्यांच्या मूळ अधिवासात सोडण्याची वनविभागाची ही पहिलीच वेळ आहे. तसेच सामाजिक वनीकरण विभाग, टर्टल सर्व्हायवल अलायन्स या आंतरराष्ट्रीय संस्थेचे तसेच, आसाम वन विभाग आणि पुण्यातील या दोन्ही संस्थांच्या सहकार्याने पुणे वनविभागातर्फे हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. असे यावेळी राहुल पाटील यांनी सांगितले.

Share to