पुणे ते मुंबई कामगार रॅलीतील कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
पिंपरी (प्रतिनिधी) – प्रचलित कामगार कायदे रद्द करून केंद्र सरकारने चार नवीन कायदे करून देशभरातील सर्व संघटित, असंघटित कामगारांची सामाजिक, आर्थिक आणि कौटुंबिक सुरक्षितता धोक्यात आणली आहे. त्याचा निषेध करत सर्व कामगार संघटनांनी रस्त्यावर उतरून विरोध केला आहे. हे कामगार कायदे रद्द करावेत आणि पूर्वीचेच कामगार कायदे लागू करावेत या मागणीसाठी महाराष्ट्र राज्यातील सर्व कामगार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रविवारी (दि. 1 मे) रोजी पुणे-मुंबई दुचाकी रॅली काढण्याची तयारी केली. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून दुचाकी रॅली मुंबईकडे रवाना होताच पोलिसांनी कामगार नेते डॉ. कैलास कदम यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक येथून या रॅलीस रविवारी सकाळी सुरुवात झाली. दुपारी तीन वाजता मुंबईतील आझाद मैदान येथे या रॅलीचे सभेत रूपांतर होणार होते. यानंतर राज्यपाल भगतसिंग कोशारी यांना भेटून निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी पत्रकार परिषदेत शुक्रवारी दिली होती. मात्र, पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून कामगारांची ही रॅली पिंपरीतच अडवण्यात आली. रॅलीतील सहभागी सर्व कामगार संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.