शरद पवार जातीयवादी ! राज ठाकरेंच्या आरोपावर राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांचे मौन
- शहरातील मतदारांमध्ये राष्ट्रवादीबाबत प्रचंड गैरसमज
- आजी-माजी नेते व पदाधिका-यांची संशयास्पद भूमिका
महाईन्यूज | अमोल शित्रे | पिंपरी-चिंचवड
वादग्रस्त भोंग्याचा राजकीय मुद्दा बनवून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वारू सुसाट सुटला आहे. मराठवाड्यातील औरंगाबादच्या सभेत ठाकरे यांनी भोंग्याचा मुद्दा लावून धरत जातीयवादाचे स्तोम पसरवण्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर केला. हा आरोप खोडून काढण्यासाठी पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादीच्या एकाही ज्येष्ठ अथवा नवख्या पदाधिका-याने किंवा नेत्याने प्रतिक्रिया दिली नाही. आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा आरोप मतदारांना खरा वाटू लागला तर त्याचा परिणाम पक्षाच्या मताधिक्यावर पडल्याशिवाय राहणार नाही. कारण, एरव्ही नको त्या मुद्यांवर अनपेक्षित प्रतिक्रियांचा भडीमार करणा-या राष्ट्रवादीच्या आजी-माजी पदाधिका-यांनी जातीयवादी या मुद्यावर मौन बाळगल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हनुमान चालिसा म्हणायला भाग पाडण्यासाठी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा कौर आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी मुंबईत मातोश्रीबाहेर ठिय्या मांडला होता. मुख्यमंत्र्यांशी पंगा घेतल्याच्या बदल्यात त्यांना जेलची हवा खावी लागली. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर याच मुद्यावरून राणा पती-पत्नींवर तुटून पडल्या. मुंबईतील असंख्य शिवसैनिक व पदाधिकारी, नेते मंडळी यांनी नवनीत राणा व रवी राणा यांचा खरपूस समाचार घेतला. शिवसेना व शिवसेनाप्रमुख यांच्याशी पंगा घेतल्यानंतर परिणाम काय होतात ?, हे त्यांना दाखवून दिले. परंतु, औरंगाबाद येथे नुकत्याच झालेल्या मनसेच्या सभेत राज ठाकरे यांनी ज्या प्रकारे शरद पवार यांच्यावर जातीयवादी, नास्तीक, इतिहासविरोधी असल्याचा आरोप केला. त्यावर पिंपरी-चिंचवडमधील एकाही राष्ट्रवादीच्या नेत्याने अथवा पदाधिका-याने राज ठाकरे यांच्या आरोपाचा समाचार घेतला नाही.
नेत्यांवरील आरोप खोडून काढण्याजोगे राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी पिंपरी-चिंचवडमध्ये आहेत. आमदार अण्णा बनसोडे, माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, माजी महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, माजी महापौर आझम पानसरे, योगेश बहल, मंगला कदम, मा. विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, नाना काटे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, महिला अध्यक्षा कविता आल्हाट, युवकचे शहराध्यक्ष इम्रान शेख, माजी शहराध्यक्ष विशाल वाकडकर, राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष सुनिल गव्हाणे, राष्ट्रवादी युवकचे प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर असे ढिगभर नेते व पदाधिकारी पिंपरी-चिंचवडमध्ये आहेत.
यापैकी एकाला सुध्दा आपल्या नेत्यावरील आरोपाचे खंडण करावे असे वाटले नाही, ही अत्यंत दुर्दैवी बाब मानली जाते. एकीकडे उद्धव ठाकरे यांच्यावरील आरोपानंतर नवनीत राणा व रवी राणा यांना मुंबईच्या महापौर पेडणेकर यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले. तर दुसरीकडे शरद पवार यांनी पिंपरी-चिंचवडमधील असंख्य कार्यकर्त्यांना महापौर केले, आमदार केले, एवढेच नाही तर पिंपरी-चिचंवड महापालिका तिजोरीच्या चाव्या हाती दिल्या, तरी त्यांनी ठाकरे यांचा निषेध केला नाही. आर्थिक हित साध्य करण्यापलिकडे राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व नेत्यांना काही दिसत नाही. शरद पवार यांच्यावरील आरोपाचे खंडण करण्याचा स्थानिक नेते, पदाधिका-यांना विसर पडणे हे राष्ट्रवादीचे दुर्दैव म्हणावे लागेल. पवारांना खरेच जातीयवादी माणून मतदारांनी महापालिका निवडणुकीत मतदान केले तर नेते मंडळींच्या बगलबच्यांची डाळ कशी शिजणार, याचा परिणाम राष्ट्रवादीच्या मताधिक्यावर नक्कीच पडणार आहे. त्यामुळे नेत्यांवर नामुष्की ओढवून घ्यावी लागणार, अशी व्यथा कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.
अजित गव्हाणे यांच्यापेक्षाही बड्या नेत्यांची चुप्पी
शरद पवार यांच्यावरील जातीयवादाचा आरोप खोडून काढण्यासाठी शहराध्यक्ष नात्याने अजित गव्हाणे यांनी व्यक्त होणे अपेक्षित होते. त्याहून महत्वाचे म्हणजे गव्हाणे यांच्याहून बडे नेते पिंपरी-चिंचवडमध्ये बलाढ्य पदांचा उपभोग घेवून घरी बसले आहेत. त्यांनी सुध्दा राज ठाकरे यांच्या आरोपाला प्रत्युत्तर देणे टाळले. नेत्यांच्या राजकीय अस्तित्वाची किंमत शून्य झाल्याचे त्यांच्या शांत बसण्यावरून समजते. नेत्यांच्या कुरघोड्यांमुळे शहर राष्ट्रवादीला शेकडो भोके पडली. ती बुजविण्याचे काम गव्हाणे निर्धाराणे करीत आहेत. एकेक कार्यकर्त्याला विश्वासात घेऊन विखुरलेले संघटन पुन्हा एकत्रीत करण्यासाठी ते झगडत आहेत. शहर पातळीवर त्यांचे काम कौतुकास्पद आहे. पण, त्यांनी प्रदेश पातळीवरील आरोपाला प्रत्युत्तर देणे जेवढे अपेक्षित नाही, तेवढेच नेत्यांनी देणे अपेक्षित आहे. जातीयवाद राज ठाकरे यांनी पसरविला की भाजपाने पसरविला, याला शरद पवार जबाबदार आहेत का, याचे स्पष्टीकरण शहरातील नेत्यांनी व पदाधिका-यांनी वेळीच दिले पाहिजे. अन्यथा मतदारांचा गैरसमज होऊन आगामी महापालिका निवडणुकीत त्याचा पक्षाला फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.