135 मशिदींवर भोंगे वाजले, पोलीस काय करीत होते; राज ठाकरे यांचा सवाल

मुंबई – मशिदींवरील लाऊडस्पीकरवरून महाराष्ट्रात राजकीय गदारोळ सुरू आहे. मशिदींतील बेकायदेशीर लाऊडस्पीकरद्वारे अजान बंद होईपर्यंत आम्ही मशिदींबाहेर हनुमान चालिसाचे पठण करू, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. या संपूर्ण वादावर राज ठाकरे यांनी बुधवारी मुंबईत पत्रकार परिषद घेतली.

पत्रकार परिषदेमध्ये राज ठाकरे म्हणाले, ‘फक्त मशिदींबाबत नाही. अनेक मंदिरांमध्ये बेकायदा लाऊडस्पीकरही लावण्यात आले आहेत. तेही मंदिरांतून काढून टाकावे. हा विषय सामाजिक आहे, धार्मिक विषय नाही.

‘माझे म्हणणे आहे की सर्व बेकायदेशीर लाऊडस्पीकर मशिदींमधून हटवले पाहिजेत, ते जोपर्यंत हटवले जात नाहीत तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरूच ठेवू. आम्ही अजानच्या वेळी मशिदीबाहेर हनुमान चालिसाचे पठण करत राहू. सरकार जर न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत नसेल तर सर्वोच्च न्यायालय काय करते हे पाहावे लागेल, असे ठाकरे म्हणाले.

आम्हाला राज्यात शांतता हवी आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या 135 मशिदींवर आज पोलीस काय कारवाई करत आहेत. पोलिस केवळ आमच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करत आहेत. न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे कारवाई होते की नाही हे पाहावे लागेल, असेही ठाकरे म्हणाले.

दुसरीकडे पोलिसांनी बुधवारी मनसेच्या 250 हून अधिक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी सांगितले की, हे कार्यकर्ते मशिदींभोवती लाऊडस्पीकरवरून हनुमान चालिसाचे पठण करण्याचा प्रयत्न करत होते, असेही ते म्हणाले.

Share to