व्याख्यानमाला : चरित्र नायकांमधील निरंतरता, जिद्द, चिकाटी, सातत्य हे गुण मला भावतात – वीणा गवाणकर

पिंपरी – चरित्र नायकांमधील निरंतरता, जिद्द, चिकाटी, सातत्य तसेच ठरवलेले शाश्वत काम शेवटपर्यंत करण्याचा ध्यास हे गुण मला भावतात, त्यातूनच चरित्र लेखनासाठी संशोधन करण्याची प्रेरणा मिळते, असे मत ज्येष्ठ लेखिका वीणा गवाणकर यांनी मांडले.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेच्या दुसऱ्या दिवशी “चरित्र लेखन – एक प्रवास” या विषयावर ज्येष्ठ लेखिका वीणा गवाणकर यांची मुलाखत पार पडली, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, उप आयुक्त रविकिरण घोडके, राजन लाखे, उमेश पाटील,देवेंद्र मोरे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मुलाखतीचे संचालन गझलकार अनिल आठलेकर यांनी केले.

चरित्र लेखनाचा प्रवास सांगत असताना वीणा गावणकर म्हणाल्या, माझे बालपण ग्रामीण भागात गेले. ग्रामीण भागात त्याकाळी रेडिओ वरील गाणी ऐकणे देखील थील्लरपणाचे समजले जात असे. त्यामुळे करमणुकीसाठी मर्यादित साधने उपलब्ध होती. वडील फौजदार असल्याने पुस्तके उपलब्ध होती. त्यामुळे पुस्तके वाचनाची आवड निर्माण झाली. यामध्ये प्रवासवर्णने, चरित्रे तसेच बखरी अधिक वाचले. साहित्य वाचनाने मी समृध्द झाले. जे भावले ते लिहित गेले…. आणि अपघाताने लेखिका झाले. ‘एक होता कार्व्हरच्या’ यशाने कुटुंबाचा माझ्यावरील विश्वास अधिक दृढ झाला. लेखन प्रवासामध्ये माझ्या कुटुंबाचा पाठिंबा महत्वपूर्ण होता. चरित्र लेखनासाठी माहिती मिळवण्यासाठी तसेच संदर्भ गोळा करण्यासाठी खूप शोध घ्यावा लागला .

स्त्रियांची चरित्र लेखन करताना त्या केवळ स्त्रिया आहेत म्हणून नाही तर त्या स्त्रियांनी विज्ञान क्षेत्रात मुलभूत संशोधन केले परंतु प्रकाश झोतात आल्या नाहीत. अशा कर्तुत्ववान स्त्रियांचे कार्य लोकांना कळावे म्हणून चरित्र लेखन केले आहे. हे करत असताना नैसर्गिक पर्यावरणासोबत सामाजिक पर्यावरण देखील तितकेच महत्वपूर्ण असते हे जाणवले. हे सामाजिक पर्यावरण आपल्या आजूबाजूला निर्माण केल्यास स्त्रिया नक्कीच प्रत्येक क्षेत्रात आपले स्थान निर्माण करतील, असेही त्या म्हणाल्या.

चरित्र लेखन करण्यासाठी आपल्याला आधी खूप सारे वाचन करावे लागते, मी ठरवून लेखिका झाले नाही तर अपघाताने लेखिका झाले. या अपघातासाठी माझी साहित्य वाचनाची आवड कारणीभूत आहे. चरित्र लेखन करण्यासाठी भरपूर वाचन, अभ्यासपूर्ण संशोधन करणे गरजेचे असते, असे मत ज्येष्ठ लेखिका वीणा गवाणकर यांनी मांडले.

दरम्यान, दि.१३ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या झालेल्या सत्रात अझादि के दिवाने या पुस्तकाचे संपादक अनिकेत यादव यांनी क्रांतीपर्वातील मूक साक्षीदार व भारतीय आरमाराची गौरवशाली परंपरा या विषयावर व्याख्यान दिले. यावेळी त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात लढलेल्या क्रांतिकारकांचा त्याग आणि देशभक्ती या विषयी सचित्र वर्णन केले. तत्कालीन दुर्मिळ छायाचित्रे, ऐतिहासिक घटना घडलेल्या स्थळांची तत्कालीन स्थिती आणि सद्यस्थिती याबाबतचे तुलनात्मक चित्र पुराव्यासह वर्णन केले. प्राचीन काळापासून भारताची असलेली आरमाराची गौरवशाली परंपरा याबाबतची प्राचीन लेणी, ताम्रपट, नाणी, शिल्प, दस्तावेज यांच्या माध्यमातून सचित्र माहिती त्यांनी यावेळी दिली.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे किल्ले उभारणी आणि आरमार उभारणी मागचे दुर दृष्टीकोन याबाबत सचित्र मार्गदर्शन यावेळी केले. आपल्या पूर्वजांनी उभारलेल्या वास्तूंचे संवर्धन केले पाहिजे. त्यामधून येणाऱ्या पिढींना प्रेरणा मिळेल. असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, उप आयुक्त रविकिरण घोडके, राजन लाखे, उमेश पाटील यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

दि. १६ ऑगस्ट २०२२ रोजी ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांचे ‘आम्ही भारताचे लोक’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. तसेच सायंकाळी ५ वाजता प्रा. डॉ. सदानंद मोरे यांचे ‘स्वातंत्र्याच्या वाटचालीत मराठी साहित्याचे योगदान’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.

Share to