संजय राऊत यांच्या कोठडीत वाढ ; आता पुस्तकातून भाजपाच्या कटकारस्तानाचा भांडाफोड करणार
मुंबई – शिवसेना खासदार संजय राऊत यांना अटक झाल्यानंतर कारागृहात त्यांनी एका पुस्तकाचे लिखान सुरू केले आहे. त्यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणातील गुन्ह्यांवर आधारित हे पुस्तक असेल. त्यामुळे संजय राऊत आपल्या पुस्तकातून कोणता भांडाफोड करणार ? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
आज संजय राऊतांची न्यायालयीन कोठडी संपली होती. त्यामुळे त्यांना मुंबई सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. त्यावेळी वेळेअगोदर पोहोचल्यामुळे संजय राऊत यांनी काही काळ माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, “सगळी केस खोटी आहे, माझा काही संबंध नाही. प्रवीण राऊत माझे नातेवाईक, फक्त दोन जणांना ओळखतो”, अशी माहिती संजय राऊतांनी दिली. मी स्वस्थ आहे, काहीच त्रास नाही, असं सांगत संजय राऊतांनी आपली खुशालीही सांगितली. त्यासोबतच सच के साथ लढ सकते हैं, झूट के साथ नहीं, असंही संजय राऊत म्हणाले.
दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत सध्या कथित पत्राचाळ घोटाळ्याच्या आरोपांखाली अटकेत आहेत. आज झालेल्या सुनावणीनंतर त्यांची रवानगी पुन्हा एकदा न्यायालयीन कोठडीत झाली आहे. संजय राऊतांना 5 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे राऊत यांना आता आर्थर रोड तुरुंगात 5 सप्टेंबरपर्यंत राहावं लागणार आहे.