‘स्वातंत्र्य भीक मागून मिळत नाही, भीक मागून पुरस्कार मिळतात’ – कन्हैय्या कुमार

पुणे – स्वातंत्र्य  भीक मागून मिळत नाही, भीक मागून पुरस्कार मिळतात, अशा शब्दांत काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांनी गुरुवारी अभिनेत्री कंगना राणावत हिच्या वक्तव्याचा समाचार घेतला. 

भारताला १९४७ मध्ये स्वातंत्र्य  हे भीक म्हणून मिळाले होते. देशाला खरं स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळाले,’ या कंगनाच्या वक्तव्याबद्दल काय वाटते, असे विचारले असता कन्हैया कुमार यांनी हा टोला लगावला. ते म्हणाले, स्वातंत्र्य भीक म्हणून कधीच मिळत नाही. स्वातंत्र्य हे संघर्ष, त्याग आणि बलिदान केल्यानंतरच मिळते. अनेकांनी आपल्या आयुष्याचा त्याग करून स्वातंत्र्य मिळवले आहे. भीक म्हणून पुरस्कार मिळू शकतो, स्वातंत्र्य मिळत नाही. 

सार्वजनिक क्षेत्र उद्ध्वस्त करून खासगी क्षेत्राला प्रोत्साहन देण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणामुळे देशाचे नुकसान झाले असल्याची टीका कन्हैया कुमार यांनी केली. बीएनएनएल मोडकळीस आले आहे. सुरुवातीला मोफत असलेल्या जिओ मोबाइलच्या रिचार्जसाठी आता किती पैसे द्यावे लागतात. विमानतळांची विक्री केल्यानंतर ‘एअरपोर्ट अॅडथॉरिटी ऑफ इंडिया’कडे आणि नागरी हवाई उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे कोणते अधिकार राहतील, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. अशा धोरणामुळि खासगी क्षेत्र कार्यक्षम राहणार नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित वार्तालापामध्ये ते बोलत होते.

Share to