विधानभवनासमोर राडा : प्रसाद लाढ यांचा खोचक टोला, ‘खोके विरूध्द ओकेचा सामना’

मुंबई – विधिमंडळ अधिवेशनाच्या निमित्ताने राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक सुरु आहे. विधानभवनाच्या पायऱ्यांवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांविरोधात “५० खोके, एकदम ओके” अशा घोषणा केल्या होत्या. त्याच घोषणांना आज सत्ताधाऱ्यांकडून प्रत्युत्तर देण्यात आहे. यावेळी सत्ताधाऱ्यांनी “सचिन वाझेचे खोके, एकदम ओके, लवासाचे खोके, बारामती ओके”, अशा घोषणा देण्यात आल्या आहेत. त्यानंतर झालेल्या राड्यावर भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी विरोधकांवर खोचक शब्दांत टीका केली आहे.

प्रसाद लाड यांनी “विरोधकांनी २५ वर्ष महापालिका लुटल्याचा दावा केला. तसेच “खोके विरुद्ध ओकेचा हा सामना होता. ज्यांनी अडीच वर्षात भ्रष्टाचार केला. २५ वर्षांत महापालिका लुटली आणि आजही ते पायऱ्यांवर उभं राहून जनतेला दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत की ते साधूसंत आहेत, त्या लोकांना आज सत्ताधाऱ्यांच्या माध्यमातून उत्तर देण्याचा प्रयत्न करण्यात आला”, असे प्रसाद लाड म्हणाले.

“सचिन वाझेचे खोके, मातोश्री एकदम ओके. लवासाचे खोके, बारामती ओके. अनिल देशमुखचे खोके, बारामती ओके. नवाब मलिक, दाऊदचे खोके, मातोश्री ओके अशा प्रकारे नारेबाजी करून सत्य परिस्थिती समोर मांडण्याचा प्रयत्न केला. करोना काळात टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रयत्न करण्याचं काम ज्यांनी केलं, त्यांना एकदम ओके करण्याचं काम आम्ही सत्ताधाऱ्यांनी आज केलं आहे”, असे प्रसाद लाड यावेळी म्हणाले.

“विरोधकांकडे बोलण्यासाठी आता काही विषय उरलेला नाही. मुख्यमंत्र्यांनी काल सांगितलं की आता खूप करुणा झाली. आता दया, माया, क्षमा काहीही नाही. विरोधकांसाठी फार सूचक विधान मुख्यमंत्र्यांनी केले आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यासोबत काम केलं आहे. त्यामुळे त्यांनी केलेला भ्रष्टाचार मुख्यमंत्र्यांना माहिती आहे”, असा दावा देखील प्रसाद लाड यांनी केला.

Share to