१८०० किलोमीटर दुचाकी प्रवासातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अनोखे अभिवादन

तुकाराम साकेकर, ज्ञानदेव कांबळे या भीम अनुयायांचा कोल्हापूर ते नागपूर प्रवास

प्रदीप लोखंडे : सांगली
खातो तो घास आणि घेतो तो श्वास, हे फक्त बाबासाहेबांमुळेच. या उक्तीची पूर्ण जाणीव भीम अनुयायांमध्ये आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपले संपूर्ण आयुष्य झिजवून समाज प्रवाहाच्या बाहेर फेकलेल्या लोकांना माणूसपण मिळवून दिले. स्वाभिमानाने जगायला शिकवले. बाबासाहेबांचे हे ऋण काही केल्या फिटणारे नाही. त्यामुळेच काही ना काही चांगली कामे करून अनेक भीम अनुयायी बाबासाहेबांच्या विषयी आपली आदराची भावना व्यक्त करत आहेत. त्यापैकीच सांगली जिल्ह्यातील आष्टा शहराचे तुकाराम साकेकर आणि ऐतवडे बुद्रुक गावचे ज्ञानदेव कांबळे हे भीम अनुयायी आहेत.

कोल्हापूर ते नागपूर आणि पुन्हा नागपूर ते कोल्हापूर असा तब्बल १ हजार ८०० किलोमीटरचा प्रवास त्यांनी बुलेट या दुचाकीवरून करत बाबासाहेबांना अनोखे अभिवादन केले आहे. सोमवारी ४ मार्च रोजी कोल्हापूर येथील बिंदू चौकातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या प्रवासाला सुरुवात झाली. तिथून कोल्हापूर येथे छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले आणि पुढील प्रवासाला सुरुवात झाली. सोलापूर, लातूर, नांदेड, यवतमाळ, वर्धा आणि मग नागपूर असा प्रवासाचा टप्पा झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो समुदायासह बौद्ध धम्म स्वीकारलेल्या नागपूर येथील दीक्षा भूमीचे दर्शन घेतले. त्यानंतर बौद्ध स्थळे ड्रॅगन पॅलेस आणि ५१ फुटी बौद्ध मूर्तीच्या स्थळी जात देखील वंदन केले. त्यांचा पुन्हा प्रवास कोल्हापूरच्या दिशेने सुरु झाला आहे.

साकेकर यांचे ६१ वर्ष वय आहे. सध्याच्या या रखरखत्या उन्हात त्यांनी आणि ज्ञानदेव कांबळे यांनी केलेल्या या प्रवासाचे कौतुक होत आहे. साकेकर हे बीएसएनएल मध्ये नोकरीला कार्यरत होते. सध्या ते निवृत्त झाले आहेत. तर ज्ञानदेव कांबळे इस्लामपूर येथील राजारामबापू कारखाना मध्ये कार्यरत आहेत. या प्रवासाविषयी तुकाराम साकेकर सांगतात की, कोल्हापूर ते नागपूर दीक्षा भूमीला दुचाकीवरूनच जाऊन अभिवादन करण्याची इच्छा होती. त्यामुळे या प्रवासाला सुरुवात केली. या मुळे इतरांनाही प्रेरणा मिळेल.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक सामाजिक परिवर्तनाचे लढे दिले आहेत. ज्या ठिकाणावरून त्यांनी आपले लढे केले. त्या ठिकाणांना ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले असून ते भीम अनुयायांचे प्रेरणास्थान देखील झाले आहे. तसेच ही ठिकाणे आजही सामाजिक लढ्याचे शक्तिस्थळ आहेत. त्यापैकीच एक दीक्षा भूमी आहे. अशा स्थळांना भेटी देऊन अभिवादन करून बाबासाहेबांनी दिलेल्या लढ्याचा आणि विचारांचा भाग होण्याचे काम अनेक जण करत आहेत. त्यापैकीच तुकाराम साकेकर आणि ज्ञानदेव कांबळे हे शिलेदार आहेत. म्हणूनच त्यांच्या या प्रवासातून केलेल्या अभिवादनाला विशेष महत्व आहे.

प्रदीप लोखंडे, संपादक, महाईन्युज.
मो. नं – ७३५०२६६९६७

Share to