भाजपा शिलेदारांची राष्ट्रवादी विरोधी तलवार होणार म्यान
- भाजपा – राष्ट्रवादीचे सरकार राज्यात झाल्यास वाळवा शिराळ्यात भाजप पदाधिकाऱ्यांची होणार गोची
प्रदीप लोखंडे : महाईन्यूज
सांगली जिल्ह्यातील वाळवा शिराळा तालुक्यात भाजपाच्या शिलेदारांनी राष्ट्रवादी विरोधी रान तापविले आहे. राज्यासह देशभरातील नेतेमंडळींना बोलावून राष्ट्रवादीवर टीकेची झोड उठवली आहे. मात्र आता भाजपाच्या याच शिलेदारांना राष्ट्रवादी विरोधी तलवार म्यान करावी लागते की काय, अशी शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात भाजप आणि राष्ट्रवादीच्या युतीचे सरकार येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता तसे झालेच तर वाळवा आणि शिराळा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीला विरोध करणाऱ्या भाजपा पदाधिकाऱ्यांची मात्र यामुळे चांगलीच गोची होणार आहे. हे नवीन सरकार झाले तर भाजपा पदाधिकाऱ्यांना देखील हातात घड्याळ बांधण्याची नामुष्की ओढावणार आहे. ज्यांच्यावर टीका केली त्यांच्या मांडीला मांडी लावून बसावे लागणार आहे. त्यानंतर सर्वच निवडणुकीतील राजकीय गणिते बदलतील अशा चर्चा राजकीय वर्तुळात आहेत.
राज्यात भाजपा आणि राष्ट्रवादीचे सरकार येण्याची चर्चा का सुरू झाली हे पहिल्यांदा पाहू. मागच्या आठवड्यात विरोधी पक्षनेते अजित पवार हे दोन दिवस ‘नॉट रीचेबल’ म्हणजेच फोन बंद करून गायब होते. ते कोणत्याही राजकीय आणि सामाजिक कार्यक्रमात दिसले नाहीत. या दरम्यान ते दिल्लीत देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना भेटून आले आहेत, अशी बातमी इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी न्यूजपेपरचे पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांनी दिली आहे. सूर्यवंशी पुढे आपल्या बातमीत म्हणतात की, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासोबत त्या बैठकीला खा. शरद पवार यांचे विश्वासू शिलेदार खासदार प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे देखील उपस्थित होते. हे सर्व जण मिळून महाराष्ट्रात युती करण्याबाबत चर्चा करत होते. त्याचा फॉर्म्युला ठरवीत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे 16 आमदार अपात्र होतील अशी शक्यता असल्यानेच भाजपा आणि राष्ट्रवादीने ही पाऊले उचलली असल्याचे बातमीत दिले आहे. तसेच या चर्चा होऊ नयेत म्हणून नेमके त्याच दरम्यान खासदार शरद पवार यांनी काँग्रेसचे अध्यक्ष खा. मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांची भेट घेतली. सर्व मीडियाचे लक्ष तिकडे वळविले. आपल्या मित्र पक्षांसह सर्वांनाच गाफील ठेवण्याची रणनीती नेहमीप्रमाणे खा. पवार खेळले असा दावा सूर्यवंशी यांनी केला आहे.
अर्थात या जर तरच्या गोष्टी आहेत. या बातमीला विशेष महत्व का द्यावे ? भाजपा आणि राष्ट्रवादीचे सरकार येईलच याची गॅरंटी काय ? असा प्रश्न अनेक जण उपस्थित करतील. मात्र सध्या ही बातमी दिलेले पत्रकार सुधीर सुर्यवंशी यांनी या पूर्वी देखील देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार पहाटेला शपथविधी करतील असे सोशल मीडियातून सांगितले होते. त्यांच्या म्हणण्याकडे कोणी विशेष महत्व दिले नाही. अखेर तसे झालेच. तेव्हा सर्वांची झोपच उडाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे सध्या सुधीर सूर्यवंशी यांनी दिलेल्या बातमीकडे सर्व जण गांभीर्याने बघत आहेत.
आता राज्यात भाजपा आणि राष्ट्रवादी सत्तेत बसले तर त्याचे परिणाम वाळवा आणि शिराळा विधानसभा मतदारसंघात देखील उमटणार हे मात्र नक्की. वाळवा मतदारसंघात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे भाजपाच्या पदाधिकाऱ्यांचा होणारा विरोध राज्यातील नेत्यांकडून दबाव आणून शांत करतील यात शंका नाही. इस्लामपूर नगरपरिषदेत स्वतःचे पारडे जड करून भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना आणि आपल्या विरोधकांना देखील ते गारद करतील हे मात्र नक्की. दुसरीकडे शिराळा मतदारसंघात देखील हीच परिस्थिती होणार. कितीही टीकेची झोड उठवली, पक्ष वाढीसाठी नेत्यांचे दौरे घडवून आणले तरी विद्यमान आमदार म्हणून आ. मानसिंगराव नाईक यांच्या पाठीमागेच भाजपा पदाधिकाऱ्यांना जावे लागणार. या मुळे शिराळा विधानसभेच्या आमदारकीची स्वप्ने पाहणाऱ्या भाजपा नेत्यांचे स्वप्न भंग होण्याची शक्यता आहे.
असो, या सर्व राजकीय घडामोडी भाजपा आणि राष्ट्रवादी सत्तेत आल्यानंतर होतील. म्हणजेच जर आणि तरच्या या चर्चा आहेत. मात्र राजकारणात केव्हाही, काहीही होऊ शकते हाच अलिखित नियम आहे. हे लक्षात ठेवून वाळवा आणि शिराळा विधानसभा मतदारसंघातील भाजपा पदाधिकाऱ्यांनी देखील आपली रणनीती आखायला हवी. अन्यथा राष्ट्रवादी विरोधात शड्डू ठोकूनही कुस्ती मात्र राष्ट्रवादीच्या बाजूने निकाली निघू नये म्हणजे झाले.
- प्रदीप लोखंडे, संपादक, महाईन्यूज
- मो. नं : 7350266967