अन्यथा बीआरटीसाठी संविधानिक मार्गाने आंदोलन छेडू
– पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांचा इशारा
– मेट्रोचे काम नसलेल्या ठिकाणी बीआरटी पूर्ण क्षमतेने सुरू करा ; डॉ. धेंडे यांची मागणी
पुणे ! प्रतिनिधी
वाहतूकीला अडथळा होत असल्याचा चुकीचा संदेश देऊन काही जण बीआरटी मार्ग बंद करण्यासाठी पाठपुरावा करत आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करणाऱ्यांचा अधिकार हिरावून घेण्याचा प्रकार आहे. गोरगरिब नागरिकांची जीवनदायी असणारा बीआरटी मार्ग बंद करू नये. अन्यथा संविधानिक मार्गाने आंदोलन छेडू, असा इशारा पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी दिला आहे. पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांना दिलेल्या निवेदनात हा इशारा देण्यात आला आहे.
डॉ. धेंडे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, पुणे शहरामध्ये 2007 नंतर मोठ्या प्रमाणात आयटी क्षेत्राचा विस्तार झाला आहे. या बरोबरच पुणे शहरात रोजगार उपलब्ध व्हावा याकरीता इतरही क्षेत्र विकसित झाले. त्याचा ताण पुणे शहरातील पायाभूत सुविधांना झालेला आहे. भविष्याचा वेध बघून पुणे शहरामध्ये मेट्रो होण्याअगोदर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम होण्यासाठी बीआरटी संकल्पना कार्यान्वित झाली. सोलापूर रोड, सातारा रोड, नगररोड, जुना मुंबई पुना रोड, आळंदी रोड या ठिकाणी राबविण्यात आली. या करीता केंद्र शासन राज्य शासन व पुणे महानगरपालिका यांनी संयुक्तपणे हजारो कोटी रूपये बीआरटी सक्षमीकरणासाठी खर्च केले.
खासगी वाहनांचा वापर कमी व्हावा, पर्यावरणाचा व्हास कमी करणे या उद्देशाने बीआरटी प्रकल्प राबविला. त्याचा शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरीक, दिव्यांग व्यक्ति, कामगार आदींना त्याचा मोठा फायदा होत आहे. नगररोड दरम्यानची बीआरटी ही कार्यान्वित झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच या बीआरटीचे उद्घाटन केले आहे. गेल्या काही वर्षांपासून नगररोड बीआरटी वर मेट्रोची सेवा चालू होणार आहे. त्याकरीता येरवडा ते विमाननगर पर्यंतची बीआरटी पूर्णपणे बंद केली आहे. गेल्या तीन वर्षाच्या कालावधीत मेट्रोचे काम व बंद बीआरटी मुळे वाहतूक कोंडी मोठया प्रमाणावर होत आहे. असे असताना बीआरटीमुळे वाहतूक कोंडी होते, असा चुकीचा संदेश दिला जात आहे. त्यामुळे तीन वर्षापासून बंद असलेला बीआरटीचा मार्ग मेट्रोचे काम सुरू नसलेल्या ठिकाणी पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करावे. पीएमपीएलच्या ताफ्यात नव्याने एक हजार बसेस दाखल होणार आहेत. त्या बीआरटी मार्गावर कार्यान्वित झाल्यास सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळेल.
तसेच नगररोड बीआरटी ही येरवडयापासून कल्याणीनगर मार्गे वळविण्यात आली त्यामुळे येरवड्यापासून ते रामवाडी पर्यंत बीआरटीला अडथळा होत नाही, असे डॉ. धेंडे म्हणाले.
इतरांनाही परवानगी द्या –
बीआरटीच्या मार्गांवर बसेस, एसटी, रुग्णवाहिका, अग्निशामक वाहने, स्कूल बसेस यांनाही परवानगी द्यावी, अशी मागणी डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी केली आहे. त्यामुळे नगर रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी कमी होईल. पुणे महापालिकेने वेळेत मेट्रो कॉर्पोरेशन ला सांगून बीआरटीची तोडफोड केलेली आहे तेथे दुरूस्तीचे काम तात्काळ करून घ्यावे. तत्काळ वॉर्डनची नियुक्ती करावी, अशीही मागणी करण्यात आली.
——————-