भोसरी-आदिनाथनगरमध्ये कच-याची गंभीर समस्या, नगरसेवकांच्या दुर्लक्षपणामुळे नागरिकांचे हाल
- नागरिकांनी व्यक्त केली तिव्र नाराजी
- दोनवेळा स्थायी समिती सभापती पद मिळूनही प्रभाग वा-यावर
पिंपरी । प्रतिनिधी
भोसरी-आदिनाथनगर येथील उद्यानाशेजारीच कचरा टाकला जात असल्यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. अनेकवेळा तक्रार करूनही स्थानिक नगरसेवक आणि महापालिका प्रशासन याकडे लक्ष देत नसल्यामुळे परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
भोसरीतील प्रभाग क्रमांक 7 येथे महापालिकेचे कै. वामनराव गव्हाणे उद्यान आहे. या उद्यानासमोरील भिंतीशेजारी परिसरातील नागरिक तसेच उद्यानात काम करणारे कर्मचारी कचरा टाकतात. पालिकेच्या आरोग्य विभागाकडून उद्यान परिसरातील साफसफाई नियमितपणे केली जात नाही. उद्यानाशेजारी पडलेला कचरा वेळेवर उचलला जात नाही. दोन-तीन दिवस हा कचरा या ठिकाणी पडलेला असतो. त्यामुळे परिसरात कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून नागरिकांमध्ये आरोग्याच्या समस्या वाढण्याची शक्यता आहे. अनेकदा आरोग्य विभागाकडे तक्रार करूनही कचरा उचलला जात नाही, अशा अनेक तक्रारी आल्या आहेत.

आदिनाथनगर येथील कै. वामनराव गव्हाणे पाटील उद्यानाचे नूतनीकरण सुरू आहे. या ठिकाणी काम करीत असलेले कर्मचारी गोळा झालेला राडारोडा उद्यानाच्या बाहेर फेकतात. तसेच, उद्यानात येणारे नागरिकदेखील कचरा टाकतात. परिणामी या ठिकाणी कायमच कचरा व घाण साचते.
परिसरातील नागरिक या ठिकाणी शिल्लक राहिलेले अन्न फेकून देतात. त्यामुळे मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. मोकाट जनावरांमुळे वाहन चालकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. रस्त्यालगत राडारोडा पडून असल्याने पादचाऱ्यांना दररोज गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. स्थानिक नागरिकांनी येथील नगरसेवकांकडे तक्रारी केल्या तरी त्याची दखल घ्यायला कोणी तयार नाही. त्यानंतर नागरिकांनी प्रशासनाकडे धाव घेवून त्यांच्यासमोर समस्यांचा पाडा वाचला. प्रशासनाने सुध्दा बोटचेपी उत्तरे देऊन टोलवाटोलवी केली. नगरसेवक आणि पालिका प्रशासनातले अधिकारी दोघेही एकाच माळेतील मणी असून त्यांना नागरिकांच्या समस्यांचे कसलेही देणेघेणे राहिलेले नसल्याचे सांगत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.